संगीतमय कारंजावरील बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेचा इतिहास चुकीचा
नागपूर : आंतरराष्ट्रीय दर्जाची संगीतमय कारंजी फुटाळा तलावावर बनवण्यात आली असून त्याची चाचणी सुरू आहे. या कारंजांसोबत नागपूर शहराचा इतिहास सांगण्यात येत असून त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मदीक्षेचा इतिहास चुकीचा असल्याचा बसपने म्हटले असून नवा वाद निर्माण झाला आहे.खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने फुटाळा येथे संगीतमय कारंजी प्रकल्पाचा ‘ट्रायल शो’ सुरू आहे. त्यात नागपूरबाबत व बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेबाबत चुकीची माहिती सांगितली जात आहे, असा दावा बसपने केला आहे. तसेच त्यात तातडीने सुधारणा करण्याची विनंती नासुप्रकडे केली आहे.
नागपूर फुटाळा तलावावर १५ सप्टेंबरपासून सुरू असलेल्या ‘लाईट व म्युझिकल फाऊंटेन ट्रायल शो’मध्ये अभिनेते अमिताभ बच्चन, गीतकार गुलजार, अभिनेते नाना पाटेकर यांचे समालोचन आहे. कारंज्यावर नागपूरचा इतिहास कथन केल्या जात आहे. यामध्ये ज्यांचा नागपूरशी फारसा संबंध नाही अशा अनेक व्यक्ती व घटनांचा उल्लेखही करण्यात आला. परंतु राजर्षी छत्रपती शाहू राजे हे ३०, ३१ मे व १ जून १९२० रोजी अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषदेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत नागपुरात उपस्थित होते. त्याचा उल्लेख मात्र हेतूत: टाळण्यात आला. १९४२ ला बाबासाहेबांच्या उपस्थितीत नागपुरातील प्रथम व सर्वात मोठी महिला परिषद आयोजित करण्यात आली. त्याचवेळी स्थापन ‘एसएसडी’ झाली आणि त्याचे संमेलन झाले होते, त्याचा साधा उल्लेखही कारंजावर सांगण्यात येत असलेल्या इतिहासात नाही, असेही बसपाचे उत्तम शेवडे म्हणाले. नासुप्रचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी म्हणाले की हा विषय छाननी समिती समोर मांडण्यात येणार असून याबाबतचा अंतिम निर्णय छाननी समिती घेईल.