त्यांनी दर्शन घेतलं आणि ते रवाना झाले”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची केसीआर यांच्यावर खोचक टीका!
मुंबईः
तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर अर्थात के चंद्रशेखर राव सध्या सोलापूर, पंढरपूर या भागाच्या दौऱ्यावर आहेत. पंढरपुरात त्यांनी विठ्ठल-रुक्मिणीचं दर्शन घेतल्यानंतर जाहीर सभा घेतली. या सभेत भागीरथ भालके यांनी भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला. यानंतर सभेत बोलताना केसीआर यांनी महाराष्ट्र सरकारवर परखड शब्दांत हल्लाबोल केला. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, वीजप्रश्न, पाणीप्रश्न सोडवण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचं ते म्हणाले. यासंदर्भात माध्यमांनी विचारणा केली असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केसीआर यांना खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. “लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार असतो. पण त्यानंतर मतं देण्याचा अधिकार जनतेच्या हातात असतो. पांडुरंगाचं दर्शन घ्यायला ते आले. त्यांच्याबद्दल जास्त भाष्य करणं मला उचित वाटत नाही. त्यांनी दर्शन घेतलं आणि ते रवाना झाले”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“के चंद्रशेखर राव यांनी आधी त्यांचा पक्ष सांभाळला पाहिजे. दिल्लीत काहीतरी झालं ना? त्यांचा पक्ष दिल्लीत फुटला ना? तो त्यांनी सांभाळावा. त्यांचं राज्य सांभाळावं. त्यांच्या राज्यातल्या लोकांना सुविधा द्याव्यात. महाराष्ट्रात आम्ही समर्थ आहोत. महाराष्ट्र सरकारने गेल्या ११ महिन्यांत जनतेला सोयीसुविधा दिल्या आहेत. सर्व घटकांसाठी कामं केली आहेत. त्यामुळे त्यांची चिंता आम्हाला नाहीये”, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
केसीआर यांनी महाराष्ट्रात शक्तीप्रदर्शन केलं?
दरम्यान, केसीआर यांनी सोलापुरात केलेल्या शक्तीप्रदर्शनावरही एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली. “महाराष्ट्रात काय शक्तीप्रदर्शन करणार? इथले लोक महाराष्ट्र सरकारसोबत आहेत. शक्ती तर तिथे तेलंगणामघ्ये दाखवायला हवी. त्यामुळे त्यांच्या दौऱ्याची दखल घेण्याची गरज नाहीये”, असं शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला
दरम्यान, केसीआर यांना भाजपाची बी टीम म्हणणाऱ्या विरोधकांना एकनाथ शिंदेंनी टोला लगावला आहे. “विरोधक आधी तर त्यांचं स्वागत करत होते. त्यांना आमंत्रण देऊन जेवू घालत होते. आता कसे ते बी टीम झाले? ही दुटप्पी भूमिका आहे. केसीआर येवो वा इतर कुणीही येवो. महाराष्ट्रातली जनता समजूतदार आहे. काम करणाऱ्या सरकारच्या पाठिशी ती ठाम आहे”, असा विश्वास एकनाथ शिंदेंनी यावेळी व्यक्त केला.