रत्नागिरीत पावसाचा कहर! खेड तालुक्यातील जगबुडीने ओलांडली धोक्याची पातळी; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा
रत्नागिरी : खेड तालुक्यात रात्रभर पावसाचा जोर कायम असल्याने जगबुडी नदी डेंजर झोन पातळीवरून वाहत असल्याने खळबळ उडाली आहे. जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवरून म्हणजेच ७.१० मीटर यावरून ही नदी वाहत आहे. ७ मीटर ही जगबुडी नदीची धोकादायक पातळी आहे. खेड शहरातील नगरपरिषद हद्दीतील नदीकाठी असलेल्या झोपडपट्टी येथील एकूण ३७ कुटुंबांना दोन दिवसांपूर्वीच सुरक्षित स्थळी हलवले आहे.
मुकदाम हायस्कूल, एलपी स्कुल आदी ठिकाणी या कुटुंबाची व्यवस्था नगरपरिषद प्रशासनाकडून करण्यात आली आहे. दरम्यान, बुधवारीच NDRF (केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू पथक) चे नवीन १८ व्यक्तींचे पथक खेड येथे दाखल झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण व खेड या ठिकाणी NDRF पथक नियुक्त करण्यात आले आहे. यामुळे दापोली खेड मार्गावरही पाणी आले नसले तरी पावसाचा जोर कायम राहिला. त्यामुळे हा मार्ग कोणत्याही क्षणी बंद होऊ शकतो.
खेड शहरात मटण मार्केटजवळ पाणी कायम आहे. शहरात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे तर सह्याद्री खोऱ्यात सुरू असलेला पाऊस यामुळेही या नदीची पाणी पातळी वाढली आहे. नारंगी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. गेल्या ८ जुलै रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या २४ तासात खेड तालुक्यात १०७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जगबुडी नदी काठच्या सुमारे पंचवीस ते तीस गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये अलसुरे निळीक, भोस्ते, शिव बुद्रुक आदी गावांचा समावेश आहे.
वेरळ व सुकीवली येथील वाड्यांनाही इशारा देण्यात आला आहे. जगबुडी नदी मंगळवारपासून अनेकदा धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. सुसेरी बौद्धवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी आल्यामुळे या मार्गदेखील बंद झाला आहे. चिर तिसे मुरडे, चाकाळे या नारंगी सुमेरीना नदीकिनाऱ्यावरील गावातील भातशेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे लावणी योग्य झालेली भातरोपे कुजण्याची दाट शक्यता आहे. पावसामुळे ठिकठिकाणी पागी भरल्यामुळे तसेच काही ठिकाणची ग्रामीण भागातील एसटी सेवा ठप्प होण्याची भीती आहे.
गेल्या २४ तासात जिल्ह्यात केवळ उत्तर रत्नागिरीत पावसाचा जोर राहिला आहे. सर्वाधिक पावसाची नोंद मंडणगड तालुक्यात १२७ मिमी इतकी झाली आहे तर चिपळूण तालुक्यात १०२ मिमी, दापोली ११२ मिमी पाऊस झाला आहे. तर सगळ्यात राजापूर तालुक्यात कमी पाऊस असून केवळ ३७ मिमी पाऊस झाला असून दक्षिण रत्नागिरीत पाऊस गेल्या २४ तासात कमी झाला आहे.