गुळुंब गावाने ‘मुलगी झाली हो’च्या चित्रीकरणाला परवानगी नाकारली
सातारा | प्रतिनिधी
सोशल मीडियावर राजकीय भूमिका मांडली म्हणून ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील अभिनेते किरण माने यांना मालिकेतून काढले आहे. या प्रकरणावरून राज्यभरातून ‘स्टार प्रवाह’ आणि ‘मुलगी झाली हो’ मालिकेच्या निर्मात्यांसह टीमवर टीका केली जात आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता ‘मुलगी झाली हो’ या मालिकेच्या सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातील गुळुंब गावात सुरू असलेल्या चित्रीकरणास परवानगी नाकारली आहे. गुळुंब गावाच्या सरपंच स्वाती शिवाजी माने यांनी याबाबतचे पत्र ‘स्टार प्रवाह’ वाहिनी आणि ‘मुलगी झाली हो’ मालिकेच्या टीमला पाठवले आहे.
‘मुलगी झाली हो’ या मालिकेचे सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातील गुळुंब गावात चित्रिकरण सुरु आहे. पण किरण माने यांना मालिकेतून काढल्यानंतर गुळुंब ग्रामपंचायतीने मालिकेच्या चित्रिकरणास परवानगी नाकारली आहे. सरपंच स्वाती शिवाजी माने यांनी पत्रात म्हटले आहे की, ‘राजकीय भूमिका मांडणाऱ्या मराठी कलावंताला मालिकेतून काढल्याबद्दल मराठी चित्रपटसृष्टीचा जाहीर निषेध! अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कुऱ्हाड चालवणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनी आणि मुलगी झाली हो या मालिकेच्या संपूर्ण टीमने हे विसरू नये की, महाराष्ट्रात अजूनही शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर लोकशाही नांदते. अशा मनुवादी विचारसरणीच्या स्टार प्रवाह वाहिनी आणि मुलगी झाली हो मालिकेच्या टीमच्या आमच्या गावी होत असलेल्या चित्रीकरणाला ग्रामपंचायत गुळुंब, तालुका वाई, जिल्हा सातारा मान्यता नाकारत आहे. अशा प्रवृत्तीला इथून पुढे आमच्या हद्दीत प्रवेश नाही.’