हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, पंचनामे करून, तात्काळ मदत द्या – आमदार राजू नवघरे
हिंगोली: जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे साडेतीन हजार हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. जिल्ह्यात काही दिवस मंदावलेला पाऊस रविवारी जोरदार झाला. जोरदार झालेल्या पावसामुळे हिंगोली जिल्ह्यासह वसमत आणि औँढा तालुक्यात खरीप पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे, तात्काळ पंचनामे करुन मदत करण्यासाठी आदेश द्यावा, अशी मागणी वसमत विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे यांनी केली आहे.
आमदार राजू नवघरे यांनी हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांची मुंबई भेट घेवून त्यांना निवेदन दिले. नवघरे म्हणाले, हिंगोली जिल्ह्यासह वसमत मतदार संघामध्ये गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे पुरस्थिती उद्भवली असून मागील तिन ते चार दिवसांपासून सलगपणे होत असलेल्या अतिवृष्टीमुळे वसमत मतदार संघातील शेतातील सोयाबिन व तुर, मुग यांसारख्या पिकांची शेतातच नासाडी झाली आहे. त्यामुळे पिक हातातून गेले आहे.
तसेच परिसरातील अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. रस्ते वाहून गेले आहेत. त्याचबरोबर पुराच्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी पुलांचे नुकसान होवून पुल तुटले आहेत. त्यामुळे, हिंगोली जिल्ह्यासह वसमत मतदार संघातील नुकसानग्रस्तांचे सरसकट पंचनामे करून त्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या, अशी मागणी राजू नवघरे यांनी केली. यावेळी अंबादास भोसले, जिल्हा परिषद सदस्य संजीव दराडे, प्रवीण टोम्पे, आदित्य आहेर, नम्मु भैय्या, भागवत कदम, डॉक्टर प्रीतम सरकटे आदी उपस्थित होते.