केंद्र सरकारच्या तीन वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचा आज भारत बंद!
मुंबई |
केंद्र सरकारच्या तीन वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी शुक्रवार २६ मार्च रोजी भारत बंद पुकारल्याने देशातील काही भागांमध्ये रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे, त्याचप्रमाणे काही भागांमधील बाजारपेठा बंद राहण्याचीही शक्यता आहे.
तथापि, विधानसभा असलेली चार राज्ये आणि पुडुचेरी हा केंद्रशासित प्रदेश येथे बंद पाळण्यात येणार नाही. देशव्यापी बंद सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पुकारण्यात येणार आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतूक रोखण्यात येणार असल्याचे शेतकऱ्यांचे ज्येष्ठ नेते बलबीरसिंग राजेवाल यांनी सांगितले. संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगार संघटना आणि वाहतूक व अन्य संघटनांनी शेतकऱ्यांच्या भारत बंदला पाठिंबा दिला आहे, असेही राजेवाल म्हणाले. शेतकरी विविध ठिकाणी रेल्वे वाहतूक रोखणार असल्याचे ते म्हणाले आहेत.