पोलिसांची कार्यक्षमता सांगताना राऊतांनी फडणवीसांना काढला चिमटा; म्हणाले…
मुंबई |
मुंबै बॅंक प्रकरणात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरुद्ध माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच माजी उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचीही चौकशी होणार असल्याचा प्रश्न माध्यमांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारला आहे. यावर आता संजय राऊत यांनी या कारवाईबाबत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलनाता संजय राऊत यांनी राज्यातील भाजपा नेत्यांसह माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. “जेव्हा महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बाबतीत चौकशा होत असतात तेव्हा भाजपाच्या लोकांना गुदगुल्या होतात. केंद्रीय तपास यंत्रणांवर दबाव आणून महाराष्ट्रातल्या नेत्यांवर खोट्या प्रकरणात चौकशा होतात तेव्हा भाजपाचे नेते रस्त्यावर उतरून लेझीम खेळायचेच बाकी असतात, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
“तपास यंत्रणांना तपास करण्याचा पूर्ण अधिकार आहे. महाराष्ट्राचे राज्य कायद्याने चालणारे राज्य आहे. जर कोणी फसवणूक, गुन्हा केला असेल, राज्याचा पैसा लुबाडला असेल तर आपले पोलीस सक्षम आहेत. ते किती सक्षम आहेत हे महाराष्ट्राचे सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना चांगले माहिती आहे. राज्याचे पोलीस किती सक्षम आहेत हे देवेंद्र फडणवीसांनी रश्मी शुक्लांच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे पोलीस कधीही खोटे गुन्हे दाखल करणार नाहीत. भविष्यात महाराष्ट्र पीएसमसी बॅंक घोडाळ्यापासून अनेक भूखंडांच्या संदर्भात काही लोक गजाआड गेले तरी मला आश्चर्य वाटणार नाही, असे संजय राऊत म्हणाले. महाविकास आघाडीच्या नेत्यांबाबत केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशी करावी अशी तुमची भूमिका असते. मग राज्याचे पोलीस आणि तपास यंत्रणा एखाद्या गुन्ह्याबाबत चौकशी करु शकत नाही का?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.