जेजुरीतील खंडेरायाची सोमवती यात्रा रद्द
जेजूरी |महाईन्यूज|
कोरोनासंदर्भात खबरदारीचा उपाय म्हणून येत्या २३ तारखेला होणारी खंडोबाची सोमवती यात्रा रद्द करण्याचा निर्णय ग्रामस्थ मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. खंडोबाची यात्रा होणार किंवा नाही, याबाबत ग्रामस्थ व भाविकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला होता. शुक्रवारी झालेल्या ग्रामस्थ मंडळाच्या बैठकीमध्ये राज्यामध्ये पसरत असलेल्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
सोमवारी (दि.२३) अमावस्या आली आहे. मात्र सूर्योदयानंतर दुसऱ्या प्रहरात अमावास्येला प्रारंभ होत असल्याने पालखी सोहळा निघणार नाही. याशिवाय खंडोबा देवस्थानच्या विश्वस्त मंडळानेही कोरोनामुळे ही यात्रा रद्द करावी, अशी सूचना केली होती. यामुळे सोमवती यात्रा व पालखी सोहळा रद्द करण्यात आला. सध्या कोरोनामुळे जेजुरी गडावर येणाऱ्या भाविकांची संख्या घटली आहे.
सोमवतीबाबत चर्चा करण्यासाठी पेशवे वाडा येथे बैठक घेण्यात आली. या वेळी खंडोबा देवाचे मुख्य मानकरी राजेंद्र पेशवे, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष गणेश आगलावे, देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त संदीप जगताप, विश्वस्त शिवराज झगडे, पंकज निकुडे, वेदमूर्ती शशिकांत सेवेकरी, रमेश राऊत, छबन कुदळे, जालिंदर खोमणे, अमोल शिंदे, दत्ता सकट, किसन कुदळे, अरुण खोमणे, राजाभाऊ खाडे, माणिक पवार, खंडेराव काकडे, माधव बारभाई, काळूराम थोरात यांच्यासह ग्रामस्थ, खांदेकरी, मानकरी उपस्थित होते.