‘पाकिस्तानची अवस्था यापेक्षा भयानक केली पाहिजे’; शरद पोंक्षेंची रोखठोक भूमिका

Operation Sindoor | पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ७ मे रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत एअर स्ट्राइक केली. या कारवाईनंतर देशभरातून तसेच बॉलीवूड आणि मराठी कलाविश्वातून भारतीय लष्कराच्या शौर्याचं कौतुक होत आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या. यात आता ज्येष्ठ मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पोंक्षे म्हणाले, की जे घडलं ते फारच वेदनादायी होतं. फारच व्यथित करणारं होतं. त्याच्यानंतर दोन दिवस झोप लागली नाही. हे असं सातत्याने काय घडत आहे हाच विचार चालू होता. हे काय आज घडत नाहीय, हे गेल्या कित्येक वर्षांपासून घडत आहे. मोहम्मद घोरीपासून अफजल खानने आक्रमण केलं. शाहिस्तेखानने आक्रमण केलं. कुतुबशहाने… निजामशाहीने आक्रमण केलं. आमच्यावर सतत आक्रमणंच होत आहेत आणि आम्ही मरतोच आहोत. त्यामुळे हे काही नवीन नाही. भयंकर वेदना देणारं आहे.
हेही वाचा : India Pakistan War 2025 | भारताचे पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर; ५० हून अधिक ड्रोन पाडले
पण आताचं जे मोदी सरकार आहे ते खूप खंबीर आहे. त्यांनी २०१४ नंतर पाकिस्तानने ज्या ज्या वेळेस असे हल्ले केले, त्या प्रत्येक हल्ल्याला आपण जबरदस्त उत्तर दिलं आहे. त्यामुळे ते प्रत्युत्तर काय असेल याची आपण सगळे वाट बघतच होतो आणि रात्री अचानक आपण हल्ला केला. सकाळी उठल्या उठल्या कळलं की, आपण नऊ दहशतवादी ठिकाणांवर जबरदस्त हल्ला केला आणि सगळं उद्ध्वस्त करून टाकलं. खूप आनंद झाला. याचं नावही इतकं सुंदर आहे की, ‘ऑपरेशन सिंदूर’. ज्या माता-भगिनींच्या कपाळावरचं कुंकू पुसलं. त्यांनी मुद्दामहून नवऱ्यांना मारलं आणि त्यांच्या बायकांना जीवंत ठेवलं. या देशातील स्त्री जेव्हा व्यथित होते आणि तिच्या कुंकवाला कोणी हात घालतं तेव्हा काय होतं. हे यातून दाखवलं गेलं. माझं असं स्पष्ट मत आहे की, ही तर सुरुवात आहे. पाकिस्तानची यापेक्षा भयानक अवस्था केली पाहिजे. पाकिस्तानची अवस्था इतकी वाईट केली पाहिजे की, यानंतर वर्षानुवर्ष त्यांनी हल्ल्याचा विचारसुद्धा नाही केला पाहिजे. भारत ही तीन अक्षरंसुद्धा त्यांच्या तोंडातून येता कामा नयेत. इतकं काहीतरी केलं पाहिजे. पण हे इतकं सोपं नसतं. जागतिक राजकारण असतं.
आपल्याला इथे बसून बोलणं फार सोपं आहे की, लगेच हल्ला का करत नाही. ते एवढं सोपं नसतं. पण अतिशय सक्षम असं हे सरकार आहे. आपले तिन्ही दलं पहिल्यापासूनच सक्षम आहेत आणि त्यांना खुली छूट देणारं आपलं सरकार आहे. त्यामुळे आमचे पंतप्रधान, अमित शहा किंवा परराष्ट्र मंत्रालय. सुरक्षा मंत्रालय या सगळ्यांचं मला अभिनंदन करावंसं वाटतं. पण एवढं झालं की, थांबलं असं करायला नको. ही तर सुरुवात आहे. हा ट्रेलर आहे, पाकिस्तानला खरा सिनेमा दाखवण्याची गरज आहे. आपली इतकी दहशत निर्माण झाली पाहिजे. आपल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी दहशत करून दाखवली होती, तसंच पाऊल आता भविष्यात लवकरच उचललं गेलं पाहिजे, असंही शरद पोंक्षें म्हणाले.