India Pakistan War 2025 | भारताचे पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर; ५० हून अधिक ड्रोन पाडले

Operation Sindoor | पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. ६-७ मे २०२५ च्या रात्री भारतीय सैन्याच्या या यशस्वी कारवाईने घाबरलेल्या पाकिस्तानने ७-८ आणि ८-९ मे च्या रात्री भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचे अनेक अयशस्वी प्रयत्न केले.
पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्र विमानांनी जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरातमधील भारतीय लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने त्यांना सडेतोड प्रत्युत्तर देत सर्व हल्ले हाणून पाडले. जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (LoC) पाकिस्तानने केलेल्या गोळीबाराला भारतीय सैन्यानेही चोख उत्तर दिले आहे.
हेही वाचा : दहशतवाद्यांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; भारताने उघडा पाडला पाकिस्तानचा खोटारडेपणा
काल रात्री (८-९ मे २०२५) पाकिस्तानने नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर उधमपूर , सांबा, जम्मू, अखनूर, नागरोटा आणि पठाणकोट येथे ड्रोन हल्ल्यांचे प्रयत्न केले. भारतीय लष्कराच्या प्रगत हवाई संरक्षण यंत्रणेने या हल्ल्यांना तात्काळ प्रत्युत्तर देत ५० हून अधिक ड्रोन नष्ट केले. या कारवाईत एल-७० तोफा, झेयू-२३एमएम, शिल्का प्रणाली आणि अत्याधुनिक काउंटर-यूएएस (Counter-UAS) उपकरणांचा यशस्वी वापर करण्यात आला.