वीजचोरी रोखण्यासाठी महावितरणची धडक मोहीम
मुंबई : महावितरणच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक वीजहानी असलेल्या फीडरवरील वीजगळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी धडक मोहीम राबवण्यास सुरुवात झाली आहे. सध्या महावितरणच्या १६ परिमंडळातील २३०० फीडरवर वीज चोरांविरुद्ध धडक कार्यवाही, नादुरुस्त मीटर बदलणे, मीटर बसविणे, कपॅसिटर बसविणे आणि वीजभाराचा समतोल राखणे आदी कामे करण्यात येणार आहेत.
साधारणपणे राज्यात महावितरणचे ११ केव्ही क्षमतेचे २५ हजार फीडर आहेत. त्यापैकी २३०० फीडर हे ४० ते ५० टक्क्यांपेक्षा जास्त वीजहानी असलेले आहेत. मराठवाडा, खान्देश या भागात वीजहानी असलेले फीडर जास्त आहेत त्या तुलनेत विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रात ४० ते ५० टक्के वीजहानी असलेले फीडर कमी आहेत. जास्त वीजहानी असलेल्या वाहिन्यांवरील वीजहानी कमी करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येणार आहे, असे महावितरणतर्फे सांगण्यात आले. वीजहानीची कारणे व त्यानुसार उपाययोजना राबिवण्यासाठी वीजवाहिन्यांचे मीटर सुस्थितीत आणणे, स्वयंचलित पद्धतीने घेण्यात आलेले मीटर वाचन अद्ययावत करणे, ग्राहकाला ज्या वितरण रोहित्रावरून वीजपुरवठा करण्यात येतो तेच रोहित्र देयक प्रणालीमध्ये आहे किंवा नाही याची खातरजमा करणे आणि योग्य ऊर्जा अंकेक्षण करणे महत्त्वाचे आहे. विजेची चोरी, अयोग्य मीटरिंग, अनधिकृत वीजपुरवठा किंवा वीजवाहिन्यांवर असलेले आकडे, मीटर वाचनातील त्रुटी ही कारणे वाणिज्यिक हानी वाढण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत, असे महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी म्हटले आहे. वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी वीजचोरांविरुद्ध धडक मोहीम राबविण्यात येईल. नादुरुस्त मीटर तातडीने बदलण्यात येतील. तसेच मीटर वाचन अचूक राहील याची दक्षता घेण्यात येईल व वीजखांबावर मीटर बॉक्स बसविण्याचे काम या मोहिमेच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे सिंघल यांनी सांगितले.