देवेंद्र फडणवीसांचा गोव्यातही ‘महाराष्ट्र पॅटर्न’; भाजपकडून विरोधकांच्या फोनचे केले टॅपिंग
मुंबई | एकीकडे अर्थसंकल्पीय अधिवेशनातील गदारोळामुळे राज्यातील राजकारण तापलेले असताना आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फोन टॅपिंगवरुन भाजपवर पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. माझे फोन आताही टॅप होत आहेत. फोन टॅपिंगचा हा ‘महाराष्ट्र पॅटर्न’ आहे आणि महाराष्ट्र पॅटर्नचे प्रमुख आता गोव्यात निवडणुकीचे प्रमुख होते. त्यामुळे गोव्यात महाराष्ट्राप्रमाणे फोन टॅपिंगचा पॅटर्न राबवला जात आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात माझा आणि खडसेंचा फोन टॅप केला जात होता. रश्मी शुक्ला यांनी हे केले आणि त्यांनी कुणाला दिलं हे सगळ्यांना माहीत आहे. आता कुलाब्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. निवडणुकीनंतरही काय चालले आहे हे माहीत व्हावे यासाठी माझा फोन टॅप केला जात होता. गोव्यात सुदिन ढवळीकर यांचाही फोन टॅप केला जातोय हे मीच त्यांना सांगितले, असे राऊत म्हणाले.
धर्म आणि देशाच्या रक्षणासाठी भाजप मोर्चा काढणार आहे. नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यासाठी हा मोर्चा होणार आहे, याकडेही राऊत याचे लक्ष वेधण्यात आले. त्यावर, धर्म आणि देशाच्या रक्षणासाठी बऱ्याच गोष्टी कराव्या लागतील. या देशातील लोकशाही आणि स्वातंत्र्यच धोक्यात आले आहे. या देशातील लोकशाही, स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासह या रोजगारही धोक्यात आला आहे. या सर्वांविरोधात ठिकठिकाणी मोर्चे काढावे लागतील, असा टोलाही त्यांनी भाजपच्या मोर्चावर लगावला.