‘सीएए’ला पाठिंबा पण ‘एनआरसी’ राज्यात लागू होऊ देणार नाही- मुख्यमंत्री
मुंबई | महाईन्यूज
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याला (सीएए) पाठिंबा दर्शवला आहे. तर, राष्ट्रीय नागरिक नोंदणीला (एनआरसी) विरोध. तसेच एनआरसी महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेनेच्या मुखपत्रासाठी दिलेल्या मुलाखतीतून त्यांनी आपली भुमिका मांडलेली आहे.
राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारचे मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांची शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपण संपादक असलेल्या शिवसेनेच्या मुखपत्रासाठी मुलाखत घेतली. या मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणतात, “सीएएमुळे देशातील कोणत्याही नागरिकाची नागरिकता हिसकावून घेतली जाणार नाही. मात्र, एनआरसी महाराष्ट्रात लागू होऊ दिले जाणार नाही. जर एनआरसी लागू झाले तर हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मातील लोकांना नागरिकता सिद्ध करणे कठीण होऊन बसेल. त्यामुळे मी असं होऊ देणार नाही.”
उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीतून हिंदुत्वाचा नारा पुन्हा एकदा बुलंद केला. त्यांनी म्हटले, “आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही आणि कधीही सोडणार नाही. महाराष्ट्रात आम्ही आघाडीचे सरकार स्थापन केले आहे. याचा अर्थ असा होत नाही की, आम्ही धर्म बदलला आहे. हिंदुत्वाच्या विचारधारेशी आम्ही कुठलीही तडजोड केलेली नाही.” ही मुलाखत येत्या काही दिवसांमध्ये प्रकाशित होणार आहे.