‘आम्ही ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही’; देवेंद्र फडणवीसांनी मांडली भाजपची भूमिका
मुंबई | राज्य सरकारने मराठा आंदोलकांच्या विविध मागण्या मान्य केल्या आहेत. यानंतर ओबीसी समाजाकडून तीव्र विरोध सुरू झाला आहे. ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी राज्य सरकारला घरचा आहेत दिला आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांचा निर्णय आपल्याला मान्य नसल्याचं म्हटलं आहे. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाची भूमिका मांडली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमचं सरकार कुठल्याही परिस्थितीत ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीदेखील तीच भूमिका आहे. आम्हाला ओबीसीचं आणि त्यांच्या हक्काचं संरक्षण करावंच लागेल. मुख्यमंत्र्याचंही तेच म्हणणं आहे.
हेही वाचा – ‘महात्मा गांधींवर नथुराम गोडसेने गोळी चालवली नाही’; रणजीत सावरकर यांचा मोठा दावा
मी राज्याला स्पष्टपणे सांगतो की, भारतीय जनता पार्टी या सरकारमध्ये आहे तोवर काहीही झालं तरी आम्ही ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. उद्या अशी वेळ आली की, आम्हाला ओबीसींना संरक्षण देता येत नाहीये. तर, मी स्वतः माझ्या वरिष्ठांशी बोलेन. काहीही झालं तरी ओबीसींवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल आणि हीच भाजपाची भूमिका आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
छगन भुजबळांच्या राज्य सरकारवरील नाराजीबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझं त्यांना एवढंच सांगणं आहे की, त्यांनी संयम ठेवावा. मी लवकरच त्यांच्याशी चर्चा करणार आहे. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावर त्यांचे जे काही आक्षेप असतील ते त्यांनी सांगावे. कुठेही ओबीसींवर अन्याय होत असेल तर आपण त्यात परिवर्तन करू. आवश्यकता असेल तिथे सुधारणा करू. परंतु, ओबीसींवर अन्याय होऊ देणार आहे.