‘..पण आमचे उद्धवजी राजे-महाराजांपेक्षा कमी नाहीयेत’; देवेंद्र फडणवीसांची टीका
मुंबई : राज्याच्या सत्तसंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक हल्लाबोल सुरू आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात आपलं सरकार स्थापन झाल्यानंतर सातत्याने बेकायदा सरकार, चुकीतं सरकार अशी टीका केली जात होतं. पण सर्वोच्च न्यायालयानं निकाल देऊन सांगितलं की एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातलंच सरकार कायदेशीर आहे आणि त्यांना सरकार स्थापन करायला सांगणं किती योग्य होतं हे निकालात आलं.
हेही वाचा – ‘ठाकरेंचा पक्षही कुटुंबाचाच पक्ष होता’; भाजपा अध्यक्षांची ठाकरेंवर खोचक टीका
काहींचं काय चाललंय… ते सांगतात आम्हीच जिंकलो. म्हटलं तुम्ही जिंकले तर बडवा. पण आमचे उद्धवजी राजे-महाराजांपेक्षा कमी नाहीयेत. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे. एका राजाला एक पोपट फार आवडत होता आणि पोपट मेला. आता प्रश्न असा आहे की, राजाला सांगेल कोण की पोपट मेला आहे?. कारण जो सांगेल त्याचा शिरच्छेद होणार. राजा विचारतो, कसा आहे आमचा पोपट? असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
तो म्हणतो पोपट चांगला आहे. पण काही खात नाही, पीत नाही. बोलत नाही. मान हलवत नाही. पाय हलवत नाही. अशीच या निर्णयानंतर शिवसेनेची अवस्था झाली आहे. त्यांना माहिती आहे की पोपट मेलाय. पण तरी सांगतायत की १६ आमदार अपात्र ठरणार, २० अपात्र ठरणार, २२ अपात्र ठरणार. पण ठीक आहे. अध्यक्षांना ते अधिकार दिले आहेत. मी कधी कायद्याच्या पलीकडे जात नाही. पण मला असं वाटतंय की कुणीतरी उद्धवजींना सांगितलं पाहिजे की उद्धवजी आता पोपट मेलाय. आता हे सरकार टिकणारही आहे, काम करणारही आहे आणि हेच सरकार पुन्हा निवडूनही येणार आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.