‘ठाकरेंचा पक्षही कुटुंबाचाच पक्ष होता’; भाजपा अध्यक्षांची ठाकरेंवर खोचक टीका
मुंबई महानगरपालिकेत भाजपाचाच महापौर होईल
मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईतील विलेपार्ले येथे आयोजित मुंबई मोर्चा आघाडीच्या बैठकीला त्यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंचा पक्ष कुटुंबाचाच पक्ष होता, अशी खोचक टीका जे.पी. नड्डा यांनी ठाकरेंवर केली आहे.
जे.पी. नड्डा म्हणाले की, भाजपा सोडून देशातील सर्व पक्ष कुटुंबाचे पक्ष झालेत. कधीकाळी डीएमकेने प्रादेशिक अस्मितांचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र आज तो एका कुटुंबाचा पक्ष झाला आहे. काँग्रेसमधून बाहेर पडून वायएसआर काँग्रेस पक्ष तयार झाला, आज तो कुटुंबाचा पक्ष झाला आहे. केसीआर यांचा तेलंगणा राष्ट्र समिती तो कुटुंबाचा पक्ष झाला आहे. महाराष्ट्रातही उद्धव ठाकरेंचा पक्षही कुटुंबाचाच पक्ष होता.
हेही वाचा – पक्षाने संधी दिल्यास पुणे लोकसभेची जागा लढवू , गुलाल उधळून दाखवते : स्वरदा बापट
उत्तर प्रदेशमध्ये भाजपा एका प्रादेशिक पक्षाबरोबर लढत आहे. काँग्रेस संपली आहे. त्यांच्याकडे कोणतीच विचारसरणी शिल्लक नाही. अखिलेश यादव अतिक अहमदसाठी उभे राहिले, त्यांची विचारसरणी कुठे राहिली. त्यांना स्वत:ला आरशात बघायलाही लाज वाटत नसेल. बिहारमध्ये तेजस्वी-लालू-मिसा हा कुटुंबाचा पक्ष झाला. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि त्यांचा भाचा असा कुटुंबाचा पक्ष झाला. सर्व प्रादेशिक पक्ष हळूहळू कुटुंबाचे पक्ष होत चालले आहेत, असं जे.पी. नड्डा म्हणाले.
मुंबई महानगरपालिकेत भाजपाचाच महापौर होईल हे आपल्याला निश्चित करायचं आहे. ज्यांच्याकडे अशी संघटनात्मक ताकद आहे त्यांनी इतर विचार करण्याची गरज नाही, असंही जे.पी. नड्डा म्हणाले.