20-25 वर्षं मुंबई महापालिकेवर राज्य करणाऱ्यांनी स्वतःची घरं भरलं; फडणवीसांचा ठाकरेंना टोला
फडणवीसांच्या भाषणातुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे कौतुक
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई दौऱ्यावर आहेत, या पार्श्वभूमीवर मुंबईतील बीकेसी मैदानात आज जंगी सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले.
20-25 वर्षं मुंबई महापालिकेवर राज्य करणाऱ्यांनी स्वतःची घरं भरली, पण त्यांनी मुंबईकरांना शुद्ध पाणी दिलं नाही. पण मुंबईकरांना शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न केला नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेबाबत कुठली स्पर्धा होऊ शकत नाही. पण त्यांची लोकप्रियता मोजायची झाली तर ती मुंबईत सर्वाधिक आहे. हे दाव्याने सांगू शकतो.ज्या मेट्रोचं आज उद्घाटन होत आहे त्याचं भूमीपूजनसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच केलं होतं. देशातले एकमेव पंतप्रधान ज्यांनी हे कल्चर देशात, महाराष्ट्रात आणलं आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईतल्या सभेत म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. बाळासाहेबांचे खरे अनुयायी एकनाथ शिंदेंनी हिंमत केली, म्हणून आज महाराष्ट्र पुन्हा विकासाच्या मार्गाला लागला आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.