“धर्मासाठी संभाजी महाराज लढले त्यामुळे ते धर्मवीर आहेत”; देवेंद्र फडणवीस
छत्रपती शिवाजी महाराज हे एकच जाणते राजे आहेत
मुंबई : छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नाही तर स्वराज्य रक्षक होते, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलं. अजित पवारांच्या या वक्तव्याचे राजकीय पडसादही उमटत आहेत. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं आहे. धर्मासाठी संभाजी महाराज लढले त्यामुळे ते धर्मवीर आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्यरक्षक म्हणायला कोणचीच ना नाही. पण संभाजी महाराज धर्मवीर नाही, हे म्हणणं चूक आहे. हा संभाजी महाराजांवर अन्याय होईल. त्यांच्या विचारांशी एकप्रकारे हा द्रोहच आहे. खऱ्या अर्थाने देव, देश आणि धर्मासाठी संभाजी महाराज लढले. त्यामुळे ते धर्मवीर आहेत, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
शरद पवारांना जाणता राजा का म्हणतात? यावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाष्य केलं. या पार्श्वभूमीवर आपल्या सर्वांचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज हेच एकमेव जाणते राजे आहेत. कुणाला आपल्या पक्षनेत्याला काही म्हणायचे असेल तर त्यांनी ते जरुर म्हणावे. पण जनतेसाठी, फक्त छत्रपती शिवाजी महाराज हे एकच जाणते राजे आहेत, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.