महाराष्ट्रात २०२४ ला भाजप पूर्ण बहुमताने निवडून येईल, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
नागपूर | महाराष्ट्रात २०२४ ला पूर्ण बहुमताचं भाजपा सरकार पहायला मिळेल. गोवा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूरमध्ये मिळालेला विजय हा मोदींच्या कामाला लोकांनी दिलेली पावती आहे. महाराष्ट्रातही तीच स्थिती आहे,” असं राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. आज ते नागपुरात दाखल झाले. गोव्याच्या विजयानंतर ते पहिल्यांदा नागपुरात गेल्याने त्यांचे आज जंगी स्वागत करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यानंतर विमानतळापासून ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घरापर्यंत रॅली काढण्यात येत आहे.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी हा जो सत्कार, स्वागत मी स्वीकारत आहे तो मोदींच्या आणि टीम गोव्याच्या वतीने असल्याचं म्हटलं. तसंच जी संधी मिळाली त्याचं सोनं करण्याचा मी प्रयत्न केला. हे आपल्या लोकांनी दिलेलं प्रेम असून मोदींच्या कामाला दिलेली पोचपावती आहे. त्याबद्दल मी आभारी आहे असंही म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, राजकारणात काहीही होऊ शकतं. पण मी काही म्हटलं तर लगेच सरकार पडणार अशा चर्चा सुरु होतात, याच्यात मला रस नाही. महाराष्ट्रात भाजपाचंच पूर्ण बहुमताचं सरकार मी आणणार,” असं यावेळी त्यांनी सांगितलं.
“ज्या क्षणी महाराष्ट्रात निवडणुका होतील तेव्हा भाजपा नंबर १ राहील आणि भाजपा आपल्या भरवशावर सरकार आणणार,” असं यावेळी फडणवीसांनी सांगितलं. नागपूर, मुंबई पालिका निवडणूक असो आम्ही नेहमी तयारच असतो असं सांगताना सध्या स्वतंत्र वाटचाल सुरु असल्याचं फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात आमची शक्ती वाढलीच आहे. आगामी सर्व निवडणुकीत ही ताकद पहायला मिळेल असंही ते म्हणाले.