राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा; अजित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला सरकारनं आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात बोलावे, अशी मागणी केली आहे. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला सरकारनं आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. यावेळी विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांनी आपली भूमिका मांडली. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यात यावी, अशीही मागणी विरोधकांकडून जोर धरू लागली आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिकं आणि बियाणे वाहून गेले आहे. तसेच अतिवृष्टीमुळे राज्यात आतापर्यंत १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या परिस्थितीत सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी अजितदादांनी केली आहे. यासंदर्भात अजित पवार आज पत्रकारपरिषद घेऊन आपली भूमिकाही स्पष्ट केली. त्यामुळे आता यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.