दोघे बाइकवरून जात होते, अचानक बिबट्याचा हल्ला, पुढे घडले ते…
रत्नागिरी : दापोली तालुक्यातील मौजे शिवाजीनगर (साखरोळी) ते दापोली रस्त्यावर साखरोळी(शिवाजीनगर) गावच्या हद्दीत बाइकद्वारे प्रवास करणारे वृषभ सुरेंद्र दाभोळकर (रा. असोंड) आणि अमर रविंद्र लांजेकर (रा. शिवाजीनगर, साखरोळी) या दोघांवर काल १५ऑगस्ट रोजी दुपारी २.३० ते २.४५ च्या दरम्यान बिबट्याने हल्ला केला. बिबट्याच्या या हल्ल्यात बाइकवर प्रवास करणारे दोघे किरकोळ जखमी झाले. या घटनेने दापोलीत खळबळ उडाली आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात जखमींना दापोलीतील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहेत. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले गेले. या घटनेत ते दोघेही सुदैवाने थोडक्यात बचावले आहेत. या घटनेनंतर आज दापोलीचे वनअधिकारी वैभव बोराटे यांनी संवाद साधला. त्यांनी घटनेची संपूर्म माहिती घेत ग्रामस्थांशी च्रर्चा केली. त्यांचे म्हणणे एकून घेतले.
सद्यस्थितीमध्ये कॅमेरा लावून बिबट्याची वहिवाट कशी आहे, हे पाहून पिंजरा बसवण्याची मागणी आज वनविभाचे समवेत झालेल्या चर्चेत ग्रामस्थांनी केली असल्याची माहिती येथील ग्रामस्थ डॉ. राजकुमार बर्वे यानी दिली. आजपर्यंत मनोज जामसुदकर, श्रीमती केळकर, विकास मेंगे, शिवराम वालपकर, सतीश पडवेकर आणि पुरुषोत्तम फावडे यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याची माहिती ग्रामस्थानी दिली.
दापोलीत बिबट्याची दहशत
या घटनेमुळे दापोलीत बिबट्याची दहशत पसरली असून आता बाहेर पडायचे की नाही, असा प्रश्न दापोलीतील नागरिकांना पडला आहे. या हल्लेखोर बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावी अशी मागणी ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे.
जेथे बिबट्याने हल्ला केला ते मार्ग हा महत्वाचा जिल्हाग्रामीण मार्ग आहे. याच रस्त्यावर हा धक्कादायक प्रकार चक्क भरदुपारी घडला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, आज झालेल्या वनविभागाच्या बैठकीत या बिबट्याचा मार्ग बघण्यासाठी सीसी टीव्ही कॅमेरा लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.