‘६ डिसेंबर पुन्हा होऊ शकतो’;असदुद्दीन ओवेसी
Gyanvapi Verdict : वाराणसी जिल्हा न्यायालयाने हिंदू पक्षाला ज्ञानवापीच्या व्यासजींच्या तळघरात पूजा करण्याची परवानगी दिली. याबाबत एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, हे प्रार्थनास्थळ कायद्याचे उल्लंघन आहे. ते म्हणाले, “न्यायाधीशांच्या निवृत्तीचा आज शेवटचा दिवस होता. १७ जानेवारी रोजी रिसीव्हर नियुक्त केले. त्यांनी संपूर्ण प्रकरणाचा निकाल दिला. जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी या कृत्याबद्दल आपले मौन तोडत नाहीत आणि मी त्यांच्यासोबत असल्याचे सांगत नाही तोपर्यंत हे सर्व सुरूच राहणार आहे”.
असदुद्दीन ओवेसी म्हणाले, “१९९३ पासून तुम्ही स्वतः म्हणत आहात की तिथे काहीही होत नाही. अपीलसाठी ३० दिवसांचा अवधी द्यायचा होता. ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात पूजा करण्यास परवानगी देणे चुकीचे आहे.” बाबरी विध्वंसाशी संबंधित एका प्रश्नावर ते म्हणाले की होय, ६ डिसेंबर पुन्हा होऊ शकतो, का होऊ शकत नाही?
वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, मुस्लिम पक्षाने वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदू बाजूच्या वकिलांनी सांगितले की, जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश यांच्या न्यायालयाने व्यासजींचे नातू शैलेंद्र यांना तळघरात पूजा करण्याचा अधिकार दिला आहे.
हेही वाचा – ‘वंचितचा महाविकास आघाडीत समावेश झालेला नाही’; प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान
त्यांनी सांगितले की, न्यायालयाने आपल्या आदेशात जिल्हा अधिकाऱ्यांना व्यासजींच्या तळघरात असलेल्या मूर्तींच्या पूजेसाठी शैलेंद्र व्यास आणि काशी विश्वनाथ ट्रस्टने नियुक्त केलेल्या पुजाऱ्यांकडून राज भोगाची व्यवस्था सात दिवसांच्या आत करण्याचे निर्देश दिले आहेत.
केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी ज्ञानवापीवरील न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ते म्हणाले की, भारतातील हिंदूंना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्यात आले आहे, माननीय न्यायालयाचा निर्णय स्वागतार्ह आहे. ते म्हणाले होते की, अयोध्या ही केवळ एक झलक आहे आणि रामलीला अजून बाकी आहे.