मुसळधार पावसाने ‘या’ गावावर दरड कोसळण्याचं संकट; नागरिकांनी स्वत: सोडली घरं
रायगड, पोलादपूर : रायगड जिल्ह्यातील चोळई इथे दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन पोलादपूर प्रशासनाने जवळपास २० कुटुंबातील ८५ लोकांना सुरक्षितस्थळी हलवले आहे. रायगडकडून रत्नागिरीच्या दिशेने येताना कशेडी घाटात डाव्या बाजूला डोंगराखली हा गाव आहे. याच ठिकाणी हाय वे वर काल मोठी दरड कोसळली होती. स्थलांतरीत करण्यात आलेल्या नागरिकांनी स्वता:हून अन्य नातेवाईकांकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आता पावसाने या परिसरात काहीशी विश्रांती घेतली आहे.
सोमवारी सकाळपासूनच तुफान सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे कशेडी घाटातील चोळई येथे दरड कोसळली. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत येथील २० कुटुंबे यातील सुमारे ८५ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी विद्यामंदिर पोलादपुर येथे हलवण्यात आले होते. प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसीलदार दिप्ती देसाई व पोलीस प्रशासनाने या ग्रामस्थांजवळ संवाद साधल्यानंतर हे लोक स्थलांतरित झाले असुन सगळे सुखरूप आहेत.
या ठिकाणी मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण कामामुळे डोंगराचा कापण्यात आलेला भाग पावसामुळे दरडीचे ढिगारेच्या ढिगारे या ठिकाणी दगड, माती खाली कोसळत आहेत. हा या गावाला धोका निर्माण झाल्याचे लक्षात आले असल्याने तालुका प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले.
यावेळी नायब तहसीलदार समीर देसाई, पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव , नरवीर रेस्क्यू टीमचे पदाधिकारी रामदास कळंबे, दीपक उतेकर यासह आपत्ती निवारण कक्षाचे अधिकारी कर्मचारी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.