“आज त्यांची वेळ आहे पण वेळ बदलेल ना; ते काही अमरपट्टा घेऊन आलेले नाहीत”
मुंबई |
“महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून दबावतंत्राचा वापर होतोय, हे लोकशाहीला घातक आहे. आम्ही भाजपची सर्व काळी कृत्ये जनतेसमोर घेऊन जाणार आहोत. भाजपाला महाराष्ट्रची जनता त्यांची जागा दाखवेल.आज त्यांचा वेळ आहे पण वेळ बदलेल ना, हे काही अमरपट्टा घेऊन आलेले नाहीत.” असं म्हणत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. नाना पटोले म्हणाले की, “महाविकास आघाडी पाडण्यासाठी अनेकदा प्रलोभन आणि दबावतंत्राचा वापर झाला, हा खऱ्या अर्थाने मोठा आक्षेप आहे. कोणाच्या इमारती किती आहेत? कोणी काय केलं? हे सगळे भाजपावाले दूधाने धुतलेले आहेत, असं तर नाही. पण खरा आक्षेप जो आहे की सरकार पाडण्यासाठी सातत्याने दबाव आणला जातोय, हा जो आक्षेप आहे हाच लोकाशाहीसाठी घातक आहे. म्हणून या आक्षेपाकडे जास्त जोर देण्याची गरज आहे.”
तसेच, “म्हणून हे बंगले आणि ही सगळ…आज त्यांचा वेळ आहे पण वेळ बदलेल ना, हे काही अमरपट्टा घेऊन आलेले नाहीत. त्यामुळे त्या विषयावर आज आम्ही काँग्रेसकडून कुठलीही भूमिका मांडणार नाही. परंतु संजय राऊत यांनी जी भूमिका मांडली आहे त्यामध्ये निश्चितपणे आम्ही जनतेसमोर आम्ही जाऊ. दबावतंत्र वापरून खोटे आरोप लावून महाविकासआघाडी सरकार पाडायचा केंद्र सरकाचा जो प्रयत्न आहे, या विषयाकडे आम्ही जनतेचं लक्ष वेधू.” असं देखील नाना पटोले यांनी सांगितलं आहे.
भाजप कडून महाविकास आघाडी सरकार पडण्याचा दबाव टाकत आहे, हा लोकशाहीला घातक आहे. आम्ही भाजपची सर्व काळी कृत्ये जनता समोर घेऊन जाणार. भाजपला महाराष्ट्रची जनता त्याची जागा दाखवेल. pic.twitter.com/3vOrbF0jfm
— Nana Patole (@NANA_PATOLE) February 16, 2022
काल(बुधवार) दुपारी शिवसेना नेते संजय राऊत यांची स्फोटक पत्रकार परिषद झाल्यानंतर नाना पटोले यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत काँग्रेसची भूमिका मांडली होती. “शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केंद्रीय तपास यंत्रणा व भाजपा नेत्यांवर पुराव्यासह केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. विरोधी पक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप करुन त्यांना नाहक बदनाम करणाऱ्या भाजपचे पितळ संजय राऊत यांनी उघडे पाडले आहे. महाविकास आघाडी सरकारने या आरोपांची गंभीर दखल घेऊन, महाराष्ट्र पोलीस, आर्थिक गुन्हे शाखेमार्फत या सर्व प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करावी. ”, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती.