breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘निसर्ग’चा प्रकोप : डॉ. आंबेडकर यांच्या मूळगावातील शाळेला पिंपरी-चिंचवड भाजपाची मदत

–      विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिनानिमित्त सामाजिक उपक्रम

– भाजपा शहराध्यक्ष तथा भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार

–      आंबडवेतील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाला ‘एक हात मदतीचा’

पिंपरी । प्रतिनिधी

शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा, असा संदेश जगाला देणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळगावी म्हणजे आंबडवे या ठिकाणी असलेली शाळा निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात जमीनदोस्त झाली. दापोलीतील ग्रामीण भागात असलेल्या या शाळेची डागडूजी करण्यासाठी आता भाजपा आमदार तथा शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या साथीने पिंपरी-चिंचवड भाजपा कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ‘एक हात मदती’चा उपक्रमांतर्गत आमदार महेश लांडगे यांनी ‘निसर्ग’ चक्रीवादाळत नुकसान झालेल्या कोकणातील विविध गावांमध्ये मतदकार्य करण्याचा निर्धार केला आहे. बुधवारी सकाळी ही मदत शाळेला पोहोच झाली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, नगरसेवक कुंदन गायकवाड, विकास डोळस सामाजिक कार्यकर्ते डॉ. संतोष बारणे आदी उपस्थित होते.

यापूर्वी पिंपरी-चिंचवडकरांनी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पूरग्रस्त नागरिकांसाठी लक्षवेधी मदतकार्य केले होते.

रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातील जालगाव या ठिकाणी सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ नावाची संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून मंडणगड येथील लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आहे. याठिकाणी सांस्कृतिक भवन, जिमखाना, महिला वसतिगृह आहे. मंडणगडपासून सुमारे १७ किमी अंतरावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळगाव आंबडवे आहे.

आंबडवे  येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यामंदिर व  असोंड येथील आश्रमशाळा व वसतिगृह चालवले जाते. अत्यंत ग्रामीण भागात संस्थेचे कार्य सुरू आहे. भटक्या विमुक्त समाजातील मुलांना, आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील मुलांना शिक्षणाची दारे खुली व्हावीत. या हेतुने संस्था कार्यरत आहे. गेल्या २६ वर्षांपासून संस्थेच्या ज्ञानार्जनाचे कार्य अखंडपणे सुरू आहे.

निसर्ग चक्रीवादळामुळे संस्थेचे मोठे नुकसान…

आंबडवे येथील आपल्या शाळेच्या इमारतीवरील व सांस्कृतिक भवनावरील एकही पत्रा व शेड शिल्लक राहिलेली नाही . तशीच परिस्थिती मंडणगड कॉलेज व बाकी शाळांची झालेली आहे . कॉलेज इमारतीवरील तसेच लेडीज हॉस्टेल व सांस्कृतिक भवनावरील सुमारे 1100 पत्र्यांचे नुकसान झाले आहे . किमान 50 ते 60 लाखांचे नुकसान आपल्या सर्व प्रकल्पाचे झाले आहे. गेल्या महिनाभरात पत्रे बसवण्याचे काम प्रगतीपथावर आहे. सांस्कृतिक भवन आणि महिला वसतिगृहाचे काम मदतीच्या प्रतीक्षेत आहे. मंडणगडच्या युनिटचे मोठे नुकसान झाले.  संस्थेच्या सर्वच पाच युनिटमधील वीज पुरवठा व्यवस्था कोलमडली आहे अशी माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष श्रीराम इदाते यांनी दिली.

राज्य शासन पुरस्कारप्राप्त शाळा पण संकटात मदत शून्य…

कर्मवीर दादासाहेब इदाते यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या आपल्या संस्थेने गेली 26 वर्ष शिक्षण क्षेत्रात अतुलनीय कार्य केले आहे. भाजपाचे माजी राज्यसभा सदस्य अमर साबळे संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. कर्मवीर दादांनी सुरू केलेल्या या सर्व संस्था अतिशय दुर्गम भागात कार्यरत आहेत. त्यामुळे साहजिकच आर्थिक विषयामध्ये संस्थेने कधीही पैसा कमविण्याचा अथवा शिक्षणाचा धंदा करण्याचा प्रयत्न केला नाही. संस्था 80 G मान्यताप्राप्त असून आपल्या संस्थेला महाराष्ट्र शासनाचा मनाचा  शाहू- फुले-आंबेडकर हा पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे. परंतु, निसर्ग चक्रीवादळ होवून एक महिना झाला. पण, राज्य सरकार अथवा जिल्हा प्रशासनाकडून कसलीही मदत संस्थेला मिळालेली नाही, अशी खंतही कार्याध्यक्ष इदाते यांनी व्यक्त केली.

स्व. गोपिनाथ मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे साकारले होते सिनिअर कॉलेज…

सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व संस्था ग्रामीण भागात आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगला शिक्षणाचा संदेश दिला. पण, त्यांच्या जन्मगावी चौथीपर्यंतसुद्धा शाळा नव्हती. ज्या भागात शिक्षणाचा लवलेश नव्हता. अशा भागातील मुलांसाठी संस्थेने शाळा सुरू केल्या आहेत. युती सरकारच्या काळात तत्कालीन मंत्री स्व. गोपिनाथ मुंडे यांच्या प्रयत्नांमुळेच मंडणगड येथे सिनिअर कॉलेज सुरू झाले. कारण, मंडणगड तालुका असला तरी, एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याला शिक्षा करावयाची असेल, तर त्याची बदली आजही मंडणगड येथे केली जाते. असोंड येथे भटके विमुक्तांसाठी आश्रमशाळा आणि ओबीसी मुलांसाठी वसतिगृह आहे. सातवीनंतर पुढे काय? म्हणून संस्थेच्या पुढाकाराने माध्यमिक वसतिगृह विनाअनुदानित तत्त्वावर सुरू केले आहे. या संस्थेच्या माध्यमातून सुमारे १ हजार २०० मुलांना शिक्षण दिले जाते. सध्या कोरोनामुळे शाळा, वसतिगृह, आश्रमशाळा बंद आहेत. पण, शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व डागडूजी करण्याची चिंता संस्था चालकांना आहे.

माजी समाज कल्याण मंत्री भाई गिरकर यांचा दानशूरपणा…

सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाला माजी समाज कल्याण मंत्री विजय तथा भाई गिरकर यांनी कायम मदत केली आहे. निसर्ग चक्रीवादळानंतर गिरकर यांनी चौथ्या दिवशी शाळेला भेट दिली. त्यावेळी झालेल्या नुकसानीची पाहणी करुन  गिरकर यांनी संस्थेला १ लाख रुपयांचा धनादेश मदत म्हणून दिला होता. तसेच, गिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या समता परिषदेकडूनही १ लाख रुपयांचा धनादेश संस्थेला देण्यात आला आहे. संस्थेच्या वाटचालीत भाई गिरकर यांचे मोठे योगदान आहे, असेही कार्याध्यक्ष इदाते यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button