#CoronaVirus: रायगड जिल्ह्यात ६३४ नागरिक परदेशातून परतले ४४४ जणांचे घरात विलगीकरण
अलिबाग -रायगड जिल्ह्यात परदेशातून परतलेल्या नागरिकांची संख्या ६३४ वर पोहचली असून त्यापैकी १४ दिवसांचा निगराणी कालावधी पूर्ण झालेले ८८ व्यक्ती आहेत. तर घरातच विलगीकरण केलेले ४४४ नागरिक आहेत. तसेच शासकीय विलगीकरण केंद्रात १०० व्यक्ती दाखल आहेत. मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात विलगीकरण केंद्रात एक नागरीक दाखल असून त्याची प्रकृती उत्तम स्थितीत असल्याचे जिल्हा प्रशाससाने सांगितले आहे. तर मुरुड येथील एका नागरिकाला शनिवारी नव्याने मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले असून त्याच्या तब्बेतीची स्थिती देखील उत्तम आहे.
आतापर्यंत मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात परदेशातून आलेल्या रायगड जिल्ह्यातील २२ नागरिकांना तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी सहा जणांची तपासणी केल्यानंतर स्वॅब टेस्टिंग न करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच कस्तुरबा रुग्णालयात १६ नागरिकांची स्वॅब टेस्टिंग करण्यात आली होती त्यापैकी एक नागरिकाचा तपासणी अहवाल प्रलंबित आहे. तपासणी अंती १४ नागरिकांचा तपासण अहवाल निगेटिव्ह आला असून फक्त एकाच व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून तो कस्तुरबा रुग्णालयात विलगीकरण केंद्रात उपचार घेत आहे. त्याच्या प्रकृतीत देखील सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले.