#CoronaVirus: मजुरांना परत आणण्यासाठी प्रयत्न हवेत- शरद पवार
राज्य सरकारांनी टाळेबंदी शिथिल केली असली तरी, स्थलांतरित मजूर आपापल्या गावी गेल्यामुळे कारखान्यांकडे कामगार नाहीत. त्यामुळे त्यांना काम सुरू करता येत नाही. आता मजुरांना परत कसे आणायचे याचा विचार करून तशी पावले उचलावी लागतील, असा महत्त्वाचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी काँग्रेसने बोलवलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत मांडला.
या बैठकीला २२ राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री व शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत हे पहिल्यांदाच भाजपविरोधकांच्या बैठकीला सहभागी झाले. औद्योगिक विकासासाठी राज्यांना नवी धोरणे राबवावी लागणार आहेत. काही शैक्षणिक संस्था आर्थिक अडचणीमुळे बंद होण्याचाही धोका आहे. याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे लागणार आहे, असेही पवार म्हणाले.
केंद्राकडून पुरेसे सहकार्य नाही
करोनाच्या संकटाला तोंड देताना आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी जीएसटीची थकबाकी देण्याची मागणी वारंवार केंद्र सरकारकडे के ली आहे. त्याचबरोबर मजुरांच्या स्थलांतरातही आणखी सहकार्य मिळायला हवे, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडून मिळत असलेले सहकार्य पुरेसे नसल्याचे विरोधी पक्षांच्या बैठकीत सूचित केले. ते प्रथमच विरोधी पक्षांच्या बैठकीत सहभागी झाले होते.