#CoronaVirus : देशात 100हून अधिक कोरोना संक्रमित रुग्ण; भारतानं पाच देशांच्या सीमा केल्या बंद
नवी दिल्ली | महाईन्यूज
कोरोनानं देशभरात हाहाकार माजवलेला आहे. अनेक देशांत या व्हायरसनं संक्रमित रुग्ण वाढताना दिसत आहेत. जगभरात 1,45,000 रुग्ण कोरोनाबाधित असून, जवळपास 5 हजार लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे याचा भारतालाही फटका बसला आहे. देशात 100हून अधिक कोरोना संसर्ग झालेले रुग्ण आढळून आल्यानं केंद्र सरकारनंही सतर्कता बाळगली आहे. महाराष्ट्रात काल रात्री कोरोनाचा संसर्ग झालेले पाच रुग्ण आढळून आल्यानं देशात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 96वरून वाढून 101वर पोहोचली आहे. भारतात आतापर्यंत या विषाणूमुळे 2 लोकांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान कोरोनाशी लढण्यासाठी केंद्र सरकार आवश्यक ती कारवाई करत असून, कुणीही घाबरून जाऊ नये, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. देशातील सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी, सतर्कता बाळगावी असे आवाहन केंद्र सरकारने नागरिकांना केले आहे. केंद्र सरकारनं कोरोना(कोविड-19)ला राष्ट्रीय आपत्ती जाहीर केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सार्क देशांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंद्वारे या संकटावर चर्चा करणार आहे. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर शेजारील पाच देशांच्या सीमाही सील करण्यात आल्या आहेत. भारत-नेपाळ, भारत-बांगलादेश, भारत-भूतान, भारत-म्यानमार, भारत-पाकिस्तान या देशांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. आता या सीमांवरून देशात प्रवेश करण्यास प्रवाशांना प्रतिबंध घालण्यात आले आहेत.