#CoronaVirus: एप्रिलनंतरही अधिक दक्षता हवी- नरेंद्र मोदी
टाळेबंदीचा कालावधी संपल्यानंतर लोक झुंडीने घराबाहेर पडतील. त्यामुळे पुन्हा करोनाचा प्रादुर्भाव होण्याची भीती असून हा धोका टाळला पाहिजे. त्यासाठी सर्व राज्यांमध्ये एकसमान धोरण राबवले पाहिजे. या संभाव्य धोरणाचा आराखडा तयार करण्यासाठी सूचना पाठवा, अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांच्या दूरसंचार यंत्रणेद्वारे गुरुवारी झालेल्या बैठकीत केली.
जगभरात करोनाचे रुग्ण वाढत आहेत. जिथे ही महासाथ नियंत्रणात आणण्यात यश आले तिथेही साथीच्या दुसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. जागतिक स्तरावर होत असलेले प्रयत्न पुरेसे नसल्याचे दिसते. त्यामुळे भारतात अधिक दक्षता बाळगण्याची गरज आहे. अन्यथा टाळेबंदी संपल्यावर लोकांचे व्यवहार पूर्ववत सुरू होतील असे सांगत मोदींनी टाळेबंदीनंतरही टाळेबंदीतील कडक दक्षतेचे पालन करण्याची अप्रत्यक्ष सूचना केली. राज्य सरकारांनी टाळेबंदीच्या अंमलबजावणीत कसूर न करण्याचाही सल्ला दिला.