#CoronaVirus: उत्तर प्रदेशात तबलिगी जमातच्या लोकांवर कारवाई ; क्वारंटाइन संपताच 17 जण तुरुंगात
देशभरात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. तबलिगी जमातच्या अनेकांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तबलिगी जमातच्या लोकांविरोधात कारवाई सुरू झाल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेशमध्ये तबलिगी जमातचे काही परदेशी लोक पासपोर्ट व व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळले आहेत. अशा लोकांची आता थेट तुरूंगात रवानगी करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये क्वारंटाइनचा कालावधी संपताच मुळच्या इंडोनेशिया व थायलंड येथील असलेल्या 17 नागरिकांना तुरूंगात पाठण्यात आले आहे. बहराइच पोलीसांनी शहरातील ताज आणि कुरैश मशीदीतून इंडोनेशिया आणि थायलंडच्या 17 नागरिकांसह 21 तबलिगी जमातच्या नागरिकांना पकडले होते, ज्यांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले होते.
क्वारंटाइन संपताच 17 परदेशी नागरिकांसह तबलिगी जमातच्या 21 नागरिकांना न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर सादर करण्यात आले. ज्यामध्ये 17 परेदशी नागरिकांना पासपोर्ट आणि व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवत तुरूंगात पाठवले आहे. या अगोदर त्यांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले होते. जिथे त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते.