“खासगी डॉक्टर्सनी आपले दवाखाने बंद ठेवून नये”,मुख्यमंत्र्यांचे आदेश
खासगी डॉक्टर्सनी आपापले दवाखाने बंद ठेवून नियमित रुग्णांची गैरसोय करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. राज्याच्या सीमा बंद असल्यानं इतर राज्यांतील अडकलेल्या नागरिकांची राज्य शासन काळजी घेईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.
सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी आज वर्षा निवासस्थान येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
मुख्यमंत्री म्हणाले की, खासगी डॉक्टर्सनी त्यांचे दवाखाने सुरू ठेवणे गरजेचे आहे. करोनाव्यतिरिक्त देखील त्यांच्याकडे इतर रोगांच्या उपचारासाठी रुग्ण येतात. त्यात वयोवृद्ध, महिला, मुले असतात त्यांची गैरसोय होऊ नये. लवकरच आपण अत्यावश्यक सेवेतील सर्वांना ओळखपत्र देत आहोत. त्यात डॉक्टर, त्यांच्याकडील कर्मचारी या सर्वांचा समावेश असेल.
आपल्या जिल्ह्यात परदेशांतून गेल्या १५ दिवसांत जर कुणी प्रवास करून आले असेल तर जिल्हाधिकारी यांनी त्यांची माहिती घ्यावी व सदरील व्यक्तींची तपासणी करून घेणे महत्वाचे आहे, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्यवस्थित राहील, औषधे लोकांना मिळतील हे प्राधान्याने पाहावे. शेतकरी आणि विशेषत: शेतीच्या कामासाठी ये जा करणाऱ्या कुणालाही अडथळा होणार नाही, याची काळजी घ्यावी असही मुख्यमंत्र्यानी सांगितलं आहे…