#CoronaVirus:शरद पवारांचं पंतप्रधान मोदींना तिसरं पत्र
मुंबई : कोरोना लॉकडाऊनच्या संकटात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पत्र लिहिलं आहे. कोरोना लॉकडाऊनमध्ये पवारांनी मोदींना लिहिलेलं हे तिसरं पत्र आहे. या पत्रात पवारांनी बांधकाम व्यवसायाच्या परिस्थितीबाबत लिहिलं आहे.
कोरोनामुळे देशातील बांधकाम व्यवसाय मोडकळीस आला आहे. मागील तीन महिन्यांपासून या क्षेत्रातील कामं बंद आहेत. त्यामुळे या क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. या क्षेत्रातील मजुरांचे स्थलांतरही मोठ्या प्रमाणात झाले आहे. यामुळे हे क्षेत्र अडचणीत आले आहे, त्याचा देशाच्या विकासदरावर परिणाम होत आहे. या व्यवसायाला अडचणीतून बाहेर आणण्यासाठी कर्जाचे पुनर्गठन, अतिरिक्त संस्थात्मक निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. तसंच व्याज माफ केले पाहिजे. बांधकाम क्षेत्रासाठी विशेष धोरणाचीही गरज आहे, असं पवारांनी या पत्रात नमूद केलं आहे.
बांधकाम व्यवसाय देशाच्या जीडीपीमध्येही मोठा हातभार लावतो, त्यामुळे राष्ट्रासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या या मुद्द्यांमध्ये पंतप्रधानांनी स्वत: लक्ष घालावं आणि आवश्यक पावलं उचलावी, अशी विनंतीही पवारांनी केली आहे.