#CoronaVirus:राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.४२ टक्के
मुंबई : कोरोनाचा फैलाव सुरु असला तरी काही प्रमाणात कोरोनाविरुद्धचा लढा यशस्वी होत हे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.४२ टक्के इतके आहे. राज्यात ६३ हजार ३४२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात गुरुवारी ३६६१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ७७ हजार ४५३ झाली आहे. गुरुवारी कोरोनाच्या ४८४१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८ लाख ४८ हजार २६ नमुन्यांपैकी १ लाख ४७ हजार ७४१ नमुने पॉझिटिव्ह (१७.४२ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ५६ हजार ४२८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३३ हजार ९५२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. गुरुवारी १९२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी १०९ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित ८३ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.६९ टक्के एवढा आहे.