#CoronaVirus:भारतात एक लाख लोकसंख्येमागे कोरोना विषाणूबाधेमुळे 0.2% मृत्यू
नवी दिल्ली. देशातील बहुतांश भागांत आर्थिक व्यवहार सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेश सरकारने ३ ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. अशी घोषणा करणारे आंध्र पहिले राज्य आहे. मुख्यमंत्री वायएसआर जगनमोहन रेड्डी यांनी मंगळवारी अधिकाऱ्यांना तशी तयारी करण्याचे आदेश दिले. दरम्यान, भारतात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा दर एक लाख लोकसंख्येमागे ०.२% असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. जागतिक पातळीवर हा दर ४.१% आहे.
आरोग्य मंत्रालयानुसार, देशात कोरोनामुळे ३,१६३ रुग्णांचा मृत्यू झाला. जागतिक आरोग्य संघटनेच्या आधारे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, अमेरिकेत १ लाख लोकसंख्येत २६.६ मृत्यू, ब्रिटनमध्ये ५२.१, इटलीत ५२.२ व फ्रान्समध्ये ४१.९ मृत्यू झाले आहेत. तर, नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी रुग्णांच्या संख्येपेक्षा मृत्यू आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाण महत्त्वाचे असल्याचे नमूद करून भारतात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून सध्या ते ३८% असल्याचे नमूद केले.