मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांचे मोठे वक्तव्य; म्हणाले….
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांमध्ये चुरस वाढलेली दिसत आहे. काँग्रेसने याआधीच स्वबळाचा नारा दिला आहे. शिवसेनेनेदेखील बालेकिल्ला असणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. यामुळे महाविकास आघाडी मुंबई महापालिका एकत्रित लढणार की स्वबळावर अशी चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
“राष्ट्रवादीत सध्या तरी मित्रपक्षांसोबत आघाडी करुन पुढं जायचं अशी चर्चा सुरु आहे. अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार आमच्या वरिष्ठांना आहे. शरद पवार, जयंत पाटील सर्वांशी चर्चा करुन निर्णय घेतील. पण आमची मानसिकता आघाडी करावी, मतांची विभागणी होऊ नये अशीच आहे. मतांची विभागणी होऊन ना मला, ना धड तुला, दे तिसऱ्याला असं होऊ शकतं. मी तरी याबाबतीत सकारात्मक आहे,” असं अजित पवार यांनी यावेळी सांगितंल.
निवडणुकीसाठी आघाडी प्रश्नावर “आधीच अंदाज व्यक्त करणं चुकीचं आहे. आम्ही बाळासाहेब थोरात, भाई जगताप यांच्यासोबत चर्चा करु. महाविकास आघाडीला अडचण होऊ नये यासाठी प्रयत्न असेल”, असे स्पष्टीकरण दिले आहे.