#CoronaVirus:कोरोना’ हे तिसरे महायुद्ध, चीनी वस्तूंवर बहिष्कार घाला : रामदास आठवले
मुंबई : ‘कोरोना’च्या प्रसाराचा जगाला धोका पोहोचू नये, यासाठीत चीनने कोणतीही खबरदारी घेतली नाही. त्यामुळे चीनवर जगाने बहिष्कार घालून धडा शिकवला पाहिजे, अशी मागणी रिपाइं अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
चीनने ‘कोरोना’ महामारीबद्दल जगाला अनभिज्ञ ठेऊन धोका दिला. कोरोना साथीचा संसर्ग जगभर वाढण्यास चीन जबाबदार आहे. चीनमधील आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण योग्य वेळी बंद करायला हवे होते. मात्र कोरोनाच्या प्रसाराचा जगाला धोका होऊ नये, याबाबत चीनने कोणतीही खबरदारी घेतली नाही. त्यामुळे जगाने चीनवर बहिष्कार घालून धडा शिकवला पाहिजे, असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.
चीनच्या वुहानमधून कोविड19 हा विषाणू जगभर पसरला. कोरोनाच्या महामारीमुळे आजवर संपूर्ण जगात 3 लाखांहून अधिक लोकांचे बळी गेले आहेत. पहिल्या-दुसऱ्या महायुद्धानंतर आता कोरोनाचे तिसरे जागतिक महायुद्ध सुरु आहे. यात जगातील 190 देश भरडले जात आहेत, असं आठवले म्हणाले.
जगावर कोरोनाचे संकट लादण्यास सर्वथा चीन जबाबदार असल्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाने चीनवर बहिष्कार घातला पाहिजे. भारतासह संपूर्ण जगाने चीनने उत्पादित केलेल्या वस्तूंवर बहिष्कार घालून चीनला धडा शिकवला पाहिजे, असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले.