करोनाची चिंता वाढू लागली, मुंबईत २९५ नवे रुग्ण
मुंबई : राज्यात बुधवारी ४७० नवीन करोनाबाधित रुग्णांचे निदान झाले असून, यात मुंबईतील २९५ करोनाबाधित रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात ३३४ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. गेल्या २४ तासांत राज्यात एकाही करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
राज्यात आजपर्यंत एकूण ७७ लाख ३३ हजार ७८६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१० टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या आठ कोटी सात लाख ८५ हजार ८०५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८ लाख ८३ हजार ८१८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. हे प्रमाण ०९.७६ टक्के आहे. तर २,१७५ करोनाबाधित रुग्ण उपचाराधीन आहेत.
मुंबई महापालिकेच्या हद्दीत बुधवारी २९५ नवीन करोनाबाधित रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे मुंबईतील करोनाबाधित रुग्णांची आजपर्यंतची एकूण संख्या १० लाख ६२ हजार ६४९ इतकी झाली आहे. ठाणे जिल्ह्यात बुधवारी पुन्हा करोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून दिवसभरात जिल्ह्यामध्ये ४९ रुग्ण आढळले. यापैकी ठाणे शहरात २४, नवी मुंबई २० आणि मिरा-भाईंदरमध्ये ५ रुग्ण आढळले असून जिल्ह्यात सध्या उपचाराधीन रुग्णांची संख्या १९३ वर गेली आहे.