चित्रा वाघांना चढला पुष्पा फीवर; १२ आमदारांचं निलंबन रद्द केल्यावर ट्वीट केला डायलॉग; म्हणाल्या, “हमारी पार्टी का…”
मुंबई |
गेल्या काही महिन्यांपासून राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात ज्या अनेक मुद्द्यांवरून राजकारण रंगलं, आरोप-प्रत्यारोप झाले आणि एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न झाले, त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे १२ आमदारांच्या निलंबनाचा प्रश्न. विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान भाजपाच्या १२ आमदारांचं गैरवर्तन केल्याप्रकरणी निलंबन करण्यात आलं होतं. हा वाद अखेर सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचल्यानंतर न्यायालयानं हे निलंबन रद्द ठरवलं आहे. याच विषयावर प्रतिक्रिया देत असताना भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी पुष्पा चित्रपटातला गाजलेला डायलॉग ट्वीट केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द करण्याच्या निर्णयाचं भाजपा नेत्यांनी स्वागत केलं आहे. याच निर्णयाबद्दल चित्रा वाघ यांनी ट्वीट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये त्या म्हणतात, महाबिघाडी सरकार पुन्हा एकदा तोंडावर आपटलंय..कायदा- नियम पायदळी तुडवून भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन केले पण सुप्रीम कोर्टानं निलंबन रद्द केलंय. महा बिघाडी सरकार किती असंवैधानिक आणि खुनशी वागतंय हे स्पष्ट झालंय.हमारे पार्टी का नाम सुनकर फ्लॅावर समझे क्या? फ्लॉवर नहीं फायर है..!
महा बिघाडी सरकार पुन्हा एकदा तोंडावर आपटलंय..
कायदा- नियम पायदळी तुडवून #bjp १२ आमदारांचे निलंबन केले पण सुप्रीम कोर्टानं निलंबन रद्द केलंय
महा बिघाडी सरकार किती असंविधानिक आणि खुनशी वागतंय हे स्पष्ट झालंय
हमारे पार्टी का नाम सुनकर फ्लॅावर समझे क्या?
फ्लॉवर नहीं🔥फायर🔥है..!😊— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 28, 2022
विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान भाजपाच्या १२ आमदारांचं गैरवर्तन केल्याप्रकरणी निलंबन करण्यात आलं होतं. हे निलंबन थोड्याथोडक्या नव्हे, तर तब्बल एका वर्षासाठी करण्यात आलं होतं. तत्कालीन तालिका अध्यक्ष आणि शिवसेना आमदार भास्कर जाधव यांच्या या निर्णयाचा भाजपाकडून तीव्र विरोध केला जात होता, तर राज्य सरकारकडून समर्थन केलं जात होतं. हा वाद अखेर सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचल्यानंतर न्यायालयानं हे निलंबन रद्द ठरवलं आहे. भाजपाच्या १२ निलंबित आमदारांमध्ये संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्य पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, पराग अलवानी, हरिश पिंपळे, योगेश सागर, जयकुमार रावळ, नारायण कुचे, राम सातपुते आणि बंटी भांगडीया यांचा समावेश होता.