मुख्यमंत्रीपदावर आत्ताच ‘क्लेम’; अजित पवार यांची रोखठोक भूमिका
‘दिलखुलास दादा’ या प्रखट मुलाखतीचे आयोजन
पिंपरी: आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर काय, आता म्हटले तरी मुख्यमंत्रीपदावर क्लेम ठेवण्याची तयारी असल्याचे मोठे विधान विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले.
दैनिक ‘सकाळ’तर्फे अजित पवार यांच्या ‘दिलखुलास दादा’ या प्रखट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते.
चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झालेल्या कार्यक्रमाला अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, त्यांच्या भगिनी यासह माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार सुनील तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार सुनील शेळके, अशोक पवार, अतुल बेनके, निलेश लंके, अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, रमेश थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आदी उपस्थित आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपदाचे आकर्षण का आहे? असे विचारले असता अजित पवार म्हणाले, 2004 मध्ये राष्ट्रवादीच्या 71 जागा आल्या होत्या. त्यावेळी मुख्यमंत्रीपद मिळेल अशी शक्यता होती. पण, दिल्लीत काय घडले माहिती नाही.
काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपद दिले. पण, त्यावेळी राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपद आले असते तर आर. आर.पाटील मुख्यमंत्री झाले असते. मी स्पष्ट बोलतो. मनात आहे ते सांगतो. लोकांना मला ऐकायला आवडते. त्यामुळे माझा ‘टीआरपी’ वाढतो. काहीजण हातचे राखून बोलतात.
… तर ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद राहिले असते!
एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत आमच्या कानावर सातत्याने येत होते. उद्धव ठाकरे यांचे सरकार आल्याच्या पहिल्या दिवसापासून हे सरकार पाडण्यासाठी भाजप प्रयत्न करत होते. शिंदे यांना ठाण्यातील अधिकारी नेमण्याचे अधिकारी दिले होते. त्याच अधिकाऱ्यांनी शिंदे यांना सुरतला सुरळीतपणे पोहोचवले. 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस आणि मी शपथ घेतल्यानंतर महाविकास आघाडीच्या आमदारांना ज्याप्रमाणे नेत्यांनी एकत्र ठेवले. त्याचप्रमाणे शिवसेनेतील बंडावेळी तीन पक्षाच्या नेत्यांनी आमदारांना एकत्र ठेवले असते तर आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहिले असते, असेही पवार म्हणाले.
… तर चिंचवडमध्ये विजय मिळाला असता!
स्वतःचे घरचे काम आहे असे समजून पुणे, पिंपरी -चिंचवड मधील कामे करतो. ती आमची जबाबदारी असते. म्हणून मी सकाळी सहा वाजल्यापासून कामाला सुरुवात करतो. शहरी आणि ग्रामीण असा आम्ही भेद करत नाही. 1999 ते 2014 पर्यंत नगरविकास, गृहनिर्माण हे शहरी भागासंदर्भातील खाते मिळाले नाही. त्यामुळे शहरी भागासाठी निर्णय घेता आले नाहीत. त्यामुळे 2019 मध्ये जाणीवपूर्वक गृहनिर्माण खाते राष्ट्रवादीने घेतले होते. निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी सुरू झाली होती. पण, तोपर्यंत सरकार गडगडले. सत्ताधारी पक्षाचा पराभव करण्याकरिता विरोधकांची मते एकत्रित राहिली पाहिजे. मतांची विभागणी न झाल्यास काय होते हे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत दिसले. रविंद्र धंगेकर निवडून आले. चिंचवडमध्ये बंडखोरी झाली नसती तर महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला असता, असेही विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.