अमोल कोल्हे भाजपात येणार? चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य
शिरूरमधील राजकीय समीकरणं बदलणार?
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरमधील खासदार अमोल कोल्हे हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधान आलं होतं. या पार्श्वभूमीवर त्यांनी अचूक अर्थ काढू नये असं स्पष्टीकरण दिलं होतं. मात्र, आता भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा अमोल कोल्हेंच्या भाजपामध्ये प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, सध्या शिंदे गटाकडे ३९ अधिक १० म्हणजेच ४९ संख्याबळ आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांना तेवढ्यावर थांबवायचं असा कोणताही विषय कुणाच्याही डोक्यात नाही. बावनकुळेंनाही तसं म्हणायचं नव्हतं. पण त्यावर आत्ताच निर्णय घेता येणं शक्य नाही. सर्वे होतील, बैछका होतील, मतमतांतरं होतील, नवीन माणसं येतील.
लोकसभा मार्चमध्ये सुरू होऊन सहा टप्प्यात होणार असेल, तर जानेवारी महिन्यात चर्चा सुरू होईल उदाहरणार्थ हातकणंगले किंवा शिरूरसारख्या मतदारसंघांचं काय करायचं असे विषय चर्चेला येतील. त्यामुळे आत्ता शिरूरचं काय करायचं हे कसं ठरवणार? गेल्या वेळी तिथून आढळराव पाटील लढले. २०१९ ला तिथे आढळरावांना पाडून अमोल कोल्हे खासदार झाले. पण समजा अमोल कोल्हेंना लोकसभा निवडणुकीच्या चार महिने आधी असं वाटू शकतं की आपण भाजपाच जावं. मग विद्यमान खासदार म्हणून त्यांनाच तिकीट द्यावं लागेल. ते ठीक आहे. पण मग विषय येईल की ते कुणाकडून लढणार? शिंदेंकडून की भाजपाकडून? मग त्यांना विचारलं जाईल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
आढळरावांसारख्या तीन टर्मचा खासदार असतानाही उद्या कोल्हे भाजपात येणार असले, तर आढळरावांना समजावलंच जाईव की कोल्हे विद्यमान खासदार आहेत. पण मग कोल्हेंना निर्णय घ्यावा लागेल की त्यांनी एकनाथ शिंदेंकडून निवडणूक लढवायची की भाजपाकडून लढायची?, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.