भोंग्यासंदर्भात केंद्र सरकारने संपूर्ण देशात धोरण आणावं – गृहमंत्री
मुंबई |
भोंग्याच्या संदर्भात केंद्रातील सरकारनेच संपू्र्ण देशासाठी एक धोरण आणावं, असं मत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मांडलं. राज्यात सध्या भोंग्यांवरून राजकीय वातावरण तापलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३ मे रोजीपर्यंतच अल्टिमेटम दिल्यानंतर ४ मे रोजी अनेक मशिदींवरील भोंगे बंद होते. तसेच, मंदिरांवरील भोंग्यांना आता या आंदोलनाचा फटका बसताना दिसला. याबाबत राज्य सरकार काही निर्णय घेणार का असा प्रश्न होता. मात्र, राज ठाकरेंचं आंदोलन फ्लॉप झाल्यानंतर आता गृहमंत्र्यांनी भोंगे विषयावर केंद्राने निर्णय घ्यावा असं म्हटलं आहे.
- हिंदू-मुस्लिमांचे मी आभार मानतो – गृहमंत्री
“मी याविषयी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो, सर्व पक्षांच्या नेत्यांशी बोललो. खरंतर यासंदर्भातील एक धोरण हे केंद्र सरकारनेच पूर्ण देशासाठी आणायला पाहिजे. ज्या काही घटना घडल्या त्यामध्ये मी हिंदू-मुस्लिम सर्वांनाच मनापासून धन्यवाद देईल, त्यांचे आभार मानेल, त्यांनी सहकार्य केलं म्हणूनच अतिशय शांततेने हा प्रश्न मार्गी लागला”, असं ते म्हणाले.
- भोंग्यासंदर्भात राज ठाकरेंचं अल्टिमेटम
मशिदीवरील भोंगे उतरवण्यासंदर्भात राज ठाकरे यांनी सरकारला ३ मे रोजीपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. त्यामुळे राज्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. ४ मे रोजी ज्या मशिदीत नमाज भोंग्यावर होईल त्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लागणार असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. त्यानंतर ४ मे रोजी पोलिसांचा मोठा बंदोबस्त संपूर्ण राज्यात होता. त्यादिवशी जवळपास ९० टक्के मशिदींमध्ये पहाटेची पहिली आजान ही भोंग्याविना झाली. त्यामुळे राज्यात ना मशिदीवरील भोंगा वाजला ना हनुमान चालीसेचा, असं चित्र होतं. मात्र, राज ठाकरेंचं हे भोंगे आंदोलन फ्लॉप गेल्याचं दिसून आलं.
मशिदीवरील भोंग्यांसोबतच आता राज्यातील मंदिरांवरील भोंगेही अडचणीत आले आहेत. आता मशिदीसह मंदिरांवरील भोंग्यासाठीही पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे. तर, रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत भोंगे बंद ठेवावे लागणार आहेत. तसेच, आवाजाची मर्यादाही पाळावी लागणार आहे.