उद्योग विश्व: ११८ कंपन्यांनी सादर केले गुणवत्ता सुधारणा उपक्रमांचे सादरीकरण
कॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया पुणे चॅप्टरचे ४० वे वार्षिक गुणवत्ता संकल्पना अधिवेशन उत्साहात
पिंपरी-चिंचवड : कॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया पुणे चॅप्टरच्या ४० व्या वार्षिक गुणवत्ता संकल्पना अधिवेशनाचे दोन दिवसीय आयोजन भोसरी येथील क्वालिटी सर्कल एक्सलन्स सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडले. या अधिवेशनात एकूण ११८ औद्योगिक संस्थांमधील १९०८ सहभागी सदस्यांनी सहभाग नोंदवून गुणवत्ता सुधारणा उपक्रमांचे सादरीकरण केले.
कार्यक्रमात एकूण ४०५ केस स्टडीज, ४९ घोषवाक्ये आणि ६२ पोस्टर्स सादर करण्यात आले. यात टाटा, किर्लोस्कर, मिंडा, लुमॅक्स, सांदार, सुप्रीम समूह, गॅबराइल इंडिया, आर एस बी ट्रान्समिशन, टाटा ऑटोकॉम तसेच राजारामबापू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इस्लामपूर यांसारख्या नामवंत संस्थांचा समावेश होता.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कार्यक्रमाचे उद्घाटन टीकेआयएल कंपनीतील रणनीती व परिवर्तन बॅटरी उद्योग विभागाचे प्रमुख सचिन जैन, भारत सरकारच्या एम एस एम ई मंत्रालयातील क्लस्टर डेव्हलपमेंट ऑफिसर अभय दापतदार यांच्या हस्ते करण्यात आले. दुसऱ्या दिवशी समारोपप्रसंगी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष व साइट अध्यक्ष पंकज यादव, सेल भिलाई स्टील प्लांटचे महाव्यवस्थापक महेश दुबे, राष्ट्रीय अध्यक्ष सतीश काळोखे, राष्ट्रीय संचालिका डॉ रजनी इंदुलकर यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा: क्रेडिट कार्डद्वारे खरेदी किंवा पेमेंट केल्यावर अनेक ऑफर्स आणि डिस्काऊंट
हे अधिवेशन सहभागी व्यवस्थापनाच्या तत्त्वज्ञानावर आधारित असून कर्मचाऱ्यांच्या समस्या निवारण उपक्रम आणि सतत सुधारणा प्रयत्नांना प्रोत्साहन देते. विविध औद्योगिक विभागांतील कर्मचाऱ्यांनी केस स्टडीजद्वारे त्यांच्या कार्यस्थळी आलेल्या समस्यांचे विश्लेषण करून अंमलात आणलेल्या प्रभावी उपाययोजना सादर केल्या. उत्पादन, सेवा, शिक्षण आणि सार्वजनिक क्षेत्रातील क्वालिटी सर्कल टीम्सनी पॉवरपॉईंट सादरीकरणाद्वारे त्यांच्या सर्वोत्तम कार्यपद्धती सामायिक केल्या.
कार्यक्रमात उत्कृष्ट गुणवत्ता उपक्रम सादर करणाऱ्या टीम्सना सुवर्ण, रजत आणि कास्य पदके तसेच प्रशस्तीपत्रके देऊन गौरवण्यात आले. सुमारे ५१ परीक्षकांनी विविध सादरीकरणांचे बारकाईने परीक्षण केले.
हे अधिवेशन शिक्षण आणि सहकार्याच्या संस्कृतीला प्रोत्साहन देणारे तसेच क्रॉस फंक्शनल संवादाला चालना देणारे ठरले. कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव करतानाच कार्यान्वयनातील उत्कृष्टतेला चालना देण्यास या अधिवेशनाने महत्त्वाची भूमिका बजावली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजया रूमाले यांनी केले. संयोजन चंद्रशेखर रूमाले, रहिम मिर्झाबेग आणि प्रशांत बोराटे यांनी केले.
आत्मनिर्भर विकसित भारत’ थीम
‘आत्मनिर्भर विकसित भारत’ या थीमवर आधारित घोषवाक्ये, पोस्टर्स व केस स्टडीजच्या माध्यमातून विविध उद्योगांमध्ये शिक्षण, संवाद आणि नेटवर्किंगला प्रोत्साहन मिळाले. कार्यक्षमता, गुणवत्ता, खर्च, सुरक्षा आणि ग्राहक समाधान यामध्ये मोजमाप करण्याजोग्या सुधारणा झाल्याचे या सादरीकरणांतून स्पष्ट झाले.





