महिलांविरोधी गुन्हे नियंत्रणात कठोर कायदा करणार : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

हैदराबाद येथे पशुवैद्यक महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिला जिवंत जाळल्याच्या घटनेचे देशभरात संतप्त पडसाद उमट आहेत. याचबरोबर आज संसंदेत देखील या घटेनेचे पडसाद उमटल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेची कठोर शब्दात निंदा केली आहे. शिवाय, या घटनेमुळे संपूर्ण देशाला लाज आणली आहे. यामुळे प्रत्येकालाच दुःख झाले आहे. गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी. महिलांविरोधातील अशाप्रकारचे गुन्हे संपुष्टात आणण्यासाठी व त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आम्ही कायद्याची निर्मिती करण्यास आहोत, ज्यासाठी संपूर्ण सभागृह देखील सहमत असेल, असे देखील त्यांनी सांगितले.
या प्रकरणाच्या सुनावणीसाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याचे निर्देश तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी रविवारी दिले आहेत. शिवाय याप्रकरणी तीन पोलिसांना देखील निलंबित करण्यात आलेले आहे. घटनेची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने एक समिती नेमली आहे. तर केंद्र सरकारने महिलाविरोधी गुन्ह्य़ांबाबत राज्य सरकारांना मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. हैदराबादेतील घटनेच्या पार्श्वभूमीवर ही कार्यवाही करण्यात आली आहे.




