भारताच्या पहिल्या पॅसेंजर ट्रेनचे नेपाळमध्ये स्वागत

काठमांडू (नेपाळ) – भारताच्या पहिल्या पॅसेंजर ट्रेनचे नेपाळमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले आहे. रविवारी भारत-नेपाळ रेल्वे लाईनचे चाचणी घेण्यात आली. बिहारमधील बथनाहावरून सुटलेली पॅसेंजर ट्रेन नेपाळच्या मोरंग स्टेशनवर पोहचली तेव्हा हजारो लोकांनी तिचे मोठ्या हर्षोल्लासाने स्वागत केले. बथनाहा (बिहार) ते मोरंग (नेपाळ) हा मार्ग 18.1 किमी लांबीचा आहे.
यापैकी 13.1 किमीचा मार्ग नेपाळमध्ये आहे. ता मार्गासाठी 4,800 कोटी रुपये खर्च आला असून आर्थिक सहयोगांतर्गत ही रक्कम भारताने नेपाळला उपलब्ध करून दिली आहे. दोन देशांमधील ब्रॉडगेजवर चालणारी ट्रेनही याच वर्षी डिसेंबर महिन्यात सुरू होणार आहे. या मार्गाने जाण्यायेण्यासाठी भारतीय आणि नेपाळी नागरिकांना व्हिसाची आवश्यकता लागणार नाही. या मार्गावरील पहिली ट्रेन पॅसेंजर ट्रेन असेल. मात्र पॅसेंजर व गुड्स ट्रेन दोन्ही प्रकारच्या ट्रेन्स चालवण्याची नेपाळी अधिकाऱ्यांची इच्छा आहे.





