विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाने पैशांचा वापर केला; नवाब मलिकांचा आरोप
मुंबई | प्रतिनिधी
नागपूर आणि अकोला-बुलडाणा-वाशिम मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. नागपूर आणि अकोल्यात भाजपाचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. या निकालानंतर भाजपा आणि महाविकास आघाडीतील नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवरून राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. या निवडणुकीत भाजपाकडून पैशांचा वापर झाला आहे. घोडेबाजार झाला असल्याचा आरोप मलिकांनी केला आहे.
या निवडणुकीत भाजपा उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांना ३६२ मते मिळाली असून त्यांनी नागपुरात दणदणीत विजय मिळवला. काँग्रेसने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना १८६ आणि नगरसेवक छोटू भोयर यांना एकच मत मिळाले. त्यामुळे भाजपाने महाविकास आघाडीला दुहेरी धक्का दिला आहे. नागपूरपाठोपाठ अकोला-वाशिम-बुलडाण्यात भाजपा उमेदवार वसंत खंडेलवाल यांनी विजय मिळवला आहे. या दोन्ही निवडणुकीत महाविकास आघाडीची ९६ मते फुटल्याचा दावा भाजपा नेते आशिष शेलार यांनी केला. त्यानंतर आता नवाब मलिक यांनी खळबळ उडवून देणारे आरोप केले आहेत.
नागपूर आणि अकोला विधान परिषद निवडणुकीचा निकाल हा भाजपाच्या बाजूने लागला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांनी या निवडणुकीत मतदान केले. या निवडणुकीत पैशांचा वापर करून घोडेबाजार झाला आहे, हे स्पष्ट आहे, असा आरोप करत राज्यसभेत पैसे घेऊन क्रॉस व्होटिंग होत असताना, संसदेत कायदा मंजूर झाला आहे. असा कायदा विधान परिषद निवडणुकांच्या संदर्भात केला पाहिजे, अशी मागणी मलिकांनी केली आहे. त्याचबरोबर, राज्य सरकारकडे अधिकार असेल तर आम्ही कायदा करू, पण अधिकार नसतील तर केंद्र सरकारने संसदेत कायदा करून या सर्व निवडणुका पारदर्शक आणि खुल्या मतदान पद्धतीने व्हाव्यात, अशी शिफारस केंद्राकडे करू, असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.