भाजपा नेते माजी आमदार बाबुरावजी पाचर्णे यांचं निधन
शिरुर । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
शिरुर हवेलीचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचं निधन झालं आहे. शिरूर येथील एका खाजगी रुग्णालयात पाचर्णे यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनामुळे कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. बाबुराव पाचर्णे यांच्यावर मागील काही दिवसांपासून शिरूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. कँन्सर सारख्या गंभीर आजाराने पाचर्णे यांना ग्रासले होते. अखेर आज सकाळी उपचारादरम्यान, पाचर्णे यांनी प्राणज्योत मालवली. बाबुराव पाचर्णे यांच्यावर मागील काही दिवसांपासून शिरूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. दोनच दिवसांपूर्वी पाचर्णे यांची प्रकृती खालावल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी रात्री उशिरा त्यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेत डॉक्टरांकडून तब्येती माहिती घेतली होती.
या वेळी पाचर्णे समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाबूराव पाचर्णे लवकरात लवकर बरे होतील आणि जनतेच्या विकासासाठी पुन्हा ते आपल्या सरकार कडे विकासकामांसाठी आग्रही राहतील अशी भावना व्यक्त केली होती. 2019 च्या निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतर पाचर्णे यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे ते राजकारणापासून दूर गेले होते. दीड वर्षांपूर्वी त्यांना कॅन्सरचं निदान झालं. त्यामुळे पुण्यातील खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. दीडवर्ष त्यांनी कर्करोगाशी लढा दिला पण त्यांची इतर अवयव निकामी होत गेली. त्यामुळे अखेरीस आज रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. खासगी रूग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.
शेतकरी कुटुंबात जन्मलेले पाचर्णे यांची अशी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. 1978 मध्ये ते शिरूर ग्रामपंचायतीमध्ये सदस्य झाले. त्यानंतर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर विजय मिळवला. त्यानंतर सलग आठ वर्ष ते बाजार समितीमध्ये सभापती राहिले होते. 1993 मध्ये ते पुन्हा एकदा बाजार समिती निवडणुकीत संचालक म्हणून निवडून आले होते.
1995 ते 2019 पर्यंत त्यांनी एकूण सहा विधानसभा निवडणुका लढवल्या त्यात त्यांनी दोन वेळा विजय मिळवला होता. पाचर्णे यांच्या मागे त्यांच्या पत्नी मालतीताई, मुलगा राहुल, मुलगी नीलिमा, तीन भाऊ, पाच बहिणी असा मोठा परिवार आहे.शहरातील सर्व समाजात त्यांना मानणारा मोठा वर्ग होता. त्यांच्या निधनाने संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली असून हळूहळू व्यक्ती केली जात आहे. घरातीलच माणूस गेल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.