Bigg Boss 15 Winner : तेजस्वी प्रकाशने जिंकली ट्रॉफी आणि 40 लाखांचं बक्षीस
छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच चर्चेत राहणारा कार्यक्रम म्हणून बिग बॉसच्या सिझन 15 कडे पाहिलं गेलं. यंदाच्या बिग बॉसमध्ये अनेक रंजक ट्विस्ट होते. ‘बिग बॉस 15’चा विजेता कोण ठरणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. शेवटच्या क्षणी तेजस्वी प्रकाश आणि प्रतीक सहजपाल यांच्यात काँटेकी टक्कर बघायला मिळाली. तेजस्वीला प्रेक्षकांनी जास्त पसंती दिली. त्यामुळे तेजस्वी या सिझनची विजेती ठरली.
अंतिम पाच स्पर्धकांमध्ये शमिता शेट्टी, तेजस्वी प्रकाश, करण कुंद्रा, निशांत भट आणि प्रतीक सहजपाल यांचा समावेश होता. हे स्पर्धक एकमेकांना तगडी टक्कर देत वेगवेगळे डावपेच आखताना पाहायला मिळाले होते. फिनालेच्या सोहळ्याचा शेवटचा क्षण हा खूप भावस्पर्शी आणि भावनिक बघायला मिळाला.
फिनालेमध्ये ‘बिग बॉस 13’ चा विजेता आणि दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाला ट्रिब्यूट दिला गेला. बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांनी कधी भांडणाने, कधी रडण्याने, कधी त्यांच्यातील प्रेमाने तर कधी त्यांच्या मैत्रीने बिग बॉसच्या घराला घरपण आणले होते. पण आता या स्पर्धकांचा या घरातला प्रवास संपला आहे.
तेजस्वी प्रकाश नेमकी कोण आहे?
तेजस्वी प्रकाशचे कुटुंब संगीत कलेच्या खूपच जवळचे आहे. मात्र तेजस्वी ही एक इंजिनिअर आहे. पण अभिनयाच्या आवडीमुळे तिने इंजिनिअरची नोकरी सोडून दिली. त्यानंतर तिने पुन्हा मागे वळून न पाहता आपल्या करिअर धडाक्यात सुरू केलं. तेजस्वीने ‘2612’ या मालिकेच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. त्यानंतर ती संस्कार धरोहर अपनों की, स्वरांगिनी जोडे रिश्तों के सूर, ‘पहरेदार पिया की’ आणि ‘सिलसिला बदलते रिश्तों का’ अशा टीव्हीवरील मालिकांमध्ये दिसून आली आहे. मालिकांसोबतच तेजस्वी प्रकाशने अनेक रिअॅलिटीशो देखील केले आहेत. ‘खतरों के खिलाड़ी 10’ व्यतिरिक्त ती ‘किचन चॅम्पियन 5’, ‘कॉमेडी नाइट्स लाइव्ह’, ‘कॉमेडी नाइट्स विद कपिल’ आणि ‘कॉमेडी नाइट्स बचाओ’ यांसारख्या शोमध्ये दिसली आहे.
2017 मध्ये तेजस्वी प्रमुख भूमिकेत असलेला ‘पहरेदार पिया’ ही मालिका वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. मालिकेच्या कथानकानुसार, तेजस्वी साकारत असलेलं पात्र एका लहान मुलाशी लग्न करतं. तो मुलगा फक्त 9 वर्षांचा दाखवण्यात आला होता. कथानक स्पष्ट झाल्यानंतर सोशल मीडियावर मालिकेवर जोरदार टीका करण्यात आली. काहींनी यासंदर्भात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला पत्र लिहून आक्षेप नोंदवला. बालविवाहाला प्रोत्साहन देत असल्याप्रकरणी मालिकेविरोधात ऑनलाईन याचिकाही दाखल करण्यात आली होती.