Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर भद्राचं सावट? शुभ मुहूर्त जाणून घ्या..
Raksha Bandhan 2023 : श्रावण पौर्णिमेला नारळी पौर्णिमा साजरी केली जाते. याच दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. बहिण -भावाच्या अतुट नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. मराठी वर्षातील महत्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन. ३० ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. रक्षाबंधनदिनी भावाला राखी बांधण्याची योग्य पद्धत कोणती? विधिवत रक्षाबंधन करताना कोणते मंत्र म्हणावेत? जाणून घेऊया..
रक्षाबंधनाचा मुहूर्त कधी?
बुधवारी ३० ऑगस्टला की गुरुवारी ३१ ऑगस्टला? याविषयी संभ्रम असल्याचे म्हटले जाते. मंत्रोपचार, पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करायचे असेल तो भद्रा करण असताना केला जात नाही. ३० ऑगस्ट रोजी सकाळी १०.५८ ते रात्री ९.०२ भद्रा करण आहे. महाराष्ट्रात मंत्रोपचार, पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करण्याची पद्धत नाही. त्यामुळे संपूर्ण दिवसात कधीही राखी बांधली तरी चालेल.
बुधवार, ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजून ५८ मिनिटांनी श्रावण पौर्णिमेचा प्रारंभ होत आहे. गुरुवार, ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजून ०५ मिनिटांनी श्रावण पौर्णिमा समाप्त होत आहे. शास्त्रनियमाप्रमाणे बुधवारी ३० ऑगस्ट रोजीच रक्षाबंधन सण साजरा करायचा आहे. शास्त्रनियम असा आहे की, सूर्योदयापासून ६ घटिकांपेक्षा जास्त व्यापिनी अशा श्रावण पौर्णिमेच्या दिवशी अपरान्हकाली किंवा प्रदोषकाली रक्षाबंधन करावयाचे आहे. तशी स्थिती बुधवारी ३० ऑगस्ट रोजीच आहे . म्हणून सर्वांनी बुधवार ३० ऑगस्ट रोजीच रक्षाबंधन सण साजरा करावा.
रक्षाबंधनाचा शास्त्रीय विधी :
- रक्षाबंधनाच्या दिवशी सकाली स्नानादी कार्ये उरकून शुचिर्भूत व्हावे. घरातील देवतांना दंडवत घालावा. आराध्य देवता, कुलदेवता यांचे नामस्मरण करावे. नमस्कार करून त्यांचे शुभाशिर्वाद घ्यावेत.
- एका ताटात किंवा ताम्हनात राखी, अक्षता, कुंकू घ्यावे. अक्षता या पाण्यात थोड्या ओल्या करून घ्याव्यात. निरांजनही तयार करावे.
- राखीचे साहित्य असलेले हे ताट किंवा ताम्हण देवघरात नेऊन बाळकृष्णाला किंवा आपल्या आराध्य देवतेला एक राखी अर्पण करावी.
- रक्षाबंधनाचा विधी सुरू असताना भावाचे सुमुख पूर्व दिशेला असावे. यामुळे सर्व देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात, असे सांगितले जाते.
- राखी बांधताना भावाने टोपी, फेटा, पगडी काहीतरी डोक्याला बांधावे. यापैकी काहीच उपलब्ध नसल्यास रुमाल बांधावा.
- रक्षाबंधनाच्या विधीत बहिणीने प्रथम भावाच्या ललाटावर पिंजर वा कुंकू लावावे. – कुमकुम तिलक लावल्यानंतर अक्षता लावाव्यात.
- यानंतर आशीर्वाद म्हणून अक्षता भावाच्या डोक्यावर टाकाव्यात.
- या विधीनंतर भावाचे औक्षण करावे.
- औक्षण केल्यानंतर भावाच्या उजव्या हातावर रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधावी. रक्षाबंधन करताना शक्य असल्यास मंत्रोच्चार करावा. यामुळे राखीच्या धाग्यात शक्तीचा संचार होतो, असे मानले जाते.
राखी बांधताना म्हणवायचे मंत्र
येन बद्धो बलि राजा, दानवेन्द्रो महाबल: तेन त्वाम् प्रतिबद्धनामि रक्षे माचल माचल:।
सिन्दूरं सौभाग्य वर्धनम, पवित्रम् पाप नाशनम्। आपदं हरते नित्यं, लक्ष्मीस्तिष्ठति सर्वदा॥, हा मंत्र टिळा लावताना म्हणावा.