“मेंदूला संसर्ग होण्यासाठी काँग्रेस नेता असणं पुरेसं असतं”
मुंबई – कोरोनाच्या महामारीत राजकारण करू नका, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस नेते मोदी सरकारवर कडाडून टीका करताना दिसत आहेत. मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा तुटवडा जाणवत आहे. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. याला आता भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी नाना पटोलेंना उत्तर दिलंय.
मेंदूला संसर्ग होण्यासाठी कोरोना जबाबदार असण्याची आवश्यकता नाही, त्यासाठी काँग्रेस नेता असणं पुरेसं असतं, असा टोला अतुल भातकळकर यांनी पटोलेंना लगावला आहे. देशात कोरोनाचा संसर्ग वाढण्यास केंद्रातील मोदी सरकार जबाबदार आहे. तर देशात लसीकरण कमी झाल्यानं मृतांची संख्या वाढत आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला होता. महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारच्या निमित्ताने नाना पटोले यांनी पंढरपुरात प्रचार सभा घेतली त्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं होतं.
मोदी सरकारच्या काळात सात वर्षात सरकारवर 1 लाख कोटी रुपयांचं कर्ज वाढले आहे. प्रतिलिटर 22 रुपयांचा अधिक कर जनतेकडून घेतला जात आहे. शेतकऱ्यांच्या नावानं हे सरकार पैसे गोळा करून लूट करत आहे. 2019 मध्ये देशाच्या सीमा बंद केल्या असत्या तर आज देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी दिसला असता, अशी देखील टीका त्यांनी केली होती.
दरम्यान, देशात सगळीकडे कोरोना पसरू लागला आहे आणि देशाचे पंतप्रधान काय करत आहेत. त्यांना निवडणूकीच पडलंय. जनता इथे कोरोनाने त्रस्त आहे तर पंतप्रधान मस्त आहेत, अशी टीका देखील त्यांनी मोदींवर केली.