‘बारामती पवारांचा सातबारा नाही, अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आलीय’; विजय शिवतारे
पुणे : रविवारी एका कार्यक्रमात बोलताना शिवतारे यांनी बारामतीच्या पवारांवर तोफ डागली. सासवडमधील पालखीतळावर अजित पवार यांनी केलेला अपमान, केवळ विजय शिवतारेंचा नसून तो संपूर्ण पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा असल्याचं शिवतारे यांनी जाहीरपणे म्हटलं. तसेच, अजित पवार त्या अपमानासाठी इथे येऊन माफी मागणार का? असा प्रश्नही शिवतारे यांनी उपस्थित केला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ हा कोणाचा सातबारा नसल्याचा म्हणत, पवार कुटुंबीयांवर शिवतारे यांनी यावेळी निशाणा साधला आहे.
अजित पवार महायुतीत आले, तरी पुरंदर विधानसभेचे आमदार विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यातील संघर्ष कमी व्हायचं नाव घेत नाही. अशातच विजय शिवतारे यांनी केलेल्या नव्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना जोरदार उधाण आलं आहे. विजय शिवतारे त्या पराभवाचा वाचपा काढणार का? अशा राजकीय चर्चांना जोरदार उधाण आलं आहे.
हेही वाचा – भारतीय सिनेसृष्टीसाठी भावूक क्षण, ऑस्कर कार्यक्रमात नितीन देसाईंना श्रद्धांजली!
बारामती लोकसभा मतदारसंघात पवारांच्या विरोधात तब्बल ५ लाख ८० हजार मतदार असलयाचा दावा केला. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेत आरपारची लढाई करण्याचा निर्णयही शिवतारे यांनी घेतला आहे. तसेच, आता गुलामगिरी करणार नसल्याचा इशारा शिवतारे यांनी दिला आहे. अशातच येणाऱ्या लोकसभेत दोन पवार विरुद्ध विजय शिवतारे आशी लढाई होणार का? हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. दरम्यान, विजय शिवतारे पुरंदर तालुक्यातील महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या खेळ खेळू पैठणीचा कार्यक्रमादरम्यान बोलत होते.